अवकाळी वादळी पावसामुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाने आर्थिक मदत करावी
उन्हाळी धान व बागायती शेती उध्वस्त तर घरांची पडझड
उध्वस्त झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करा
कोरोनामुळे अगोदरच आर्थिक व मानसिक विवंचनेत सापडलेल्या शेतकऱ्यांना व नागरिकांना शासनाकडून मदतीची आवश्यकता
सुखसागर झाडे:- गडचिरोली जिल्ह्यात मागील काही दिवसात वादळ वारा व अवकाळी पावसाने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले असून अनेक लोकांची घरे पडली आहेत, त्यामुळे शासनाने तातडीने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना व नागरिकांना आर्थिक मदत करावी अशा मागणीची आर्तहाक नुकसान ग्रस्त नागरीकांनी शासनाला केली आहे.
चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांमध्ये वादळ वाऱ्यामुळे वेलतुर तुकूम येथील प्रभाकर गोहने यांच्या नवीन घरावरील सिमेंट पत्रे उडून फुटल्याने आर्थिक नुकसान झाले आहे. काही लोकांचे कौलारू छत तसेच उन्हाळी डबल फसल धानाचे, फळबागांचे तसेच बागायती शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्याचबरोबर अनेक घरांची पडझड होऊन लोकांचे फार मोठे नुकसान झालेले आहे. त्यामुळे अशा उध्वस्त झालेल्या पिकांचे व घरांचे तातडीने पंचनामे करून शासनाने आर्थिक विवंचनेत सापडलेल्यांना आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी नुकसानग्रस्त नागरिकांनी केली आहे.