कटाक्ष:अरब इस्रायल संघर्ष! जयंत माईणकर

0
472

कटाक्ष:अरब इस्रायल संघर्ष! जयंत माईणकर

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईनमध्ये ११दिवसांच्या संघर्षामुळं सुमारे २०० लोकांचा बळी गेल्यानंतर अखेर अमेरिकेच्या दबावाखाली युद्धविराम जाहीर करण्यात आला. कोरोना या विषाणू मुळे पृथ्वीवरील सुमारे ८०० कोटी मानव समूह आज बाहेर येण्यास घाबरत आहे. पण याही परिस्थितीत एकमेकांना लागून असलेल्या या दोन देशातून नागरी वस्त्यांवर सुद्धा रॉकेट द्वारे हल्ले केले गेले. ज्यूबहुल
इस्राएल ची लोकसंख्या सुमारे एक कोटी तर मुस्लिमबहुल पॅलेस्टाईनची लोकसंख्या सुमारे ५०लाख. गेल्या ७५ वर्षात या संघर्षात एक लाखाहून जास्त व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. सध्या भारतात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित भारतीय जनता पक्षाचे राज्य आहे. आणि मुस्लिम विरोध या समान धाग्यामुळे सध्याचे सरकार हे जास्त इस्रायल धार्जिणे आहे. भलेही भारताने इस्रायलला १९५० सालीच मान्यता दिली होती.पण संघ परिवाराची या देशाविषयीची भावना काही वेगळीच असते. गमतीची गोष्ट ही की संघ ज्या हिटलरच्या फॅसिस्ट विचारसरणीवर आधारीत आहे त्या हिटलरने १९४१ ते ४५या काळात सुमारे ६० लाख ज्यूना गॅस चेंबर किंवा इतर माध्यमाने मारून टाकले.जगाच्या इतिहासात ही घटना Holocaust (होलोकॉस्ट)या नावाने प्रसिद्ध आहे.हिटलरच्या विचारसरणीवर चालणारा संघ परिवार आज हिटलरने ज्या ज्यूद्वेषावर जर्मनीत आपला प्रभाव वाढवला त्या ज्यूंविषयी सध्याच्या सरकारला ममत्व आहे. दरम्यान, इस्रायलला अमेरिकेसह पश्चिमी राष्ट्रांचे पाठबळ आहे. पॅलेस्टाईनसोबत जगभरातले मुस्लीम राष्ट्र आहेत. अगदी भारताचाही १९८८ साली अस्तित्वात आलेल्या पॅलेस्टाईन या देशाला पाठिंबा आहे. इस्रायल आणि आसपासच्या अरब देशांमध्ये आतापर्यंत आठ युद्ध, आणि सतत सशस्त्र संघर्ष पाहायला मिळाला आहे. आतापर्यंत या युद्धात दोन्ही बाजूंच्या लष्करी आणि नागरी अशा सुमारे एक लाख व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत.

पॅलेस्टाइन आणि इस्राईल या दोघांचाही जेरुसलेम या शहरावर दावा आहे. यावरून अनेक वर्षांपासून याबाबत संघर्ष सुरु आहे.

शेख जर्रा इथून पॅलेस्टिनी लोकांना बाहेर काढण्यात येत असल्याचे पॅलेस्टाईनचं म्हणणे आहे. त्यावरून हा सगळा वाद सुरू आहे.

*हमासचा रोल काय आहे?*

हमास ही एक पॅलेस्टाईन राजकीय मते असणारी दहशतवादी संघटना आहे. त्यांनी 1987 मध्ये आपल्या स्थापनेपासूनच इस्रायलच्याविरोधात युद्ध पुकारलं आहे.

हमास इस्रायलवर सातत्याने रॉकेटद्वारे हल्ले करुन निशाणा साधतो. इस्रायलला एक पॅलेस्टाईन राज्य बनवायची हमासची इच्छा आहे. या दहशतवादी संघटनेच्या ध्येयधोरणामध्येच इस्त्रायला उद्धवस्त करण्याचा उद्देश लिहीला गेला आहे.

या दहशतवादी संघटनेने इस्त्रायलच्या विरोधात 1990 आणि 2000 च्या दरम्यान आत्मघातकी हल्ले केले होते. मात्र, अलिकडच्या वर्षांमध्ये हमासने रॉकेट्सच्या माध्यमातून हल्ले चढवणे सुरु केले आहे

पॅलेस्टाइनच्या गाझा पट्टीत रणकंदन चालले होते. गाझातील रुग्णालये, अनाथालये, नागरी वस्त्या कोणताच भाग सुरक्षित राहिला नव्हता. जगभर इस्रायलच्या आक्रमणाविरुद्ध जनतेत आक्रोश सुरू झाला.

याआधीही संयुक्त राष्ट्र संघाच्या मानवाधिकार परिषदेने इस्रायलच्या निषेधाचा प्रस्ताव मंजूर केला होता. ठरावाच्या बाजूने २९ मते पडली. १७ देश तटस्थ राहिले.
आणि फक्त अमेरिकेचे विरोधी मत पडले. भारताच्या संसदेत निषेधाचा ठराव मंजूर करायला सरकारने नकार दिला होता. पण ब्रिक्सच्या बैठकीत मात्र पंतप्रधानांना इस्रायलच्या विरोधातील प्रस्तावावर सह्या कराव्याच लागल्या. जगातील लोकभावना जरी पॅलेस्टाइनला सहानुभूती दर्शवणारी आणि इस्रायलच्या आक्रमणाचा विरोध करणारी असली तरी भारतात मात्र इस्रायलसाठी सहानुभूती असणारी विचारसरणी सध्या बोलकी झालेली दिसते आहे. अर्थात त्याचा संबंध वर उल्लेखीलेल्या मुस्लिम विरोध या समान धाग्याशी आहे.संघ परीवार आणि भाजप इस्रायलशी कायम राजकीय सहानुभूती बाळगून आहेत.डॉ सुब्रमण्यम स्वामी याबाबतीत सतत आग्रही होते. इस्रायल लष्कर ज्याप्रमाणे संशयावरून अनेक नागरी वस्त्यांवर अतिरेकी असल्याच्या संशयावरून हल्ले केले त्याप्रमाणे काश्मिरी अतिरेक्यांवर कारवाई करावी असा मानणारा एक मोठा आहे आणि तो सध्या सत्तेत आहे.
*अरब इस्रायल संघर्षाचा १९४७ पासूनचा इतिहास खालीलप्रमाणे आहे.*
१९४७ साली संयुक्त राष्ट्रसंघाकडून पॅलेस्टाईनचे यहुदी आणि अरबांमध्ये विभाजन करावे की नाही ? यावर मतदान झाले. जेरुसलेमला आंतरराष्ट्रीय शहराचा दर्जा देण्यात आला. हा निवाडा यहुदींनी मान्य केला. तर हा निवाडा अरबांनी अमान्य केला. १९४८ साली ब्रिटनने पॅलेस्टाईनमधून माघार घेतली. तसेच ब्रिटीशांनी पॅलेस्टाईनचा ताबा सोडला.

 

ब्रिटीश जाताच यहुदींनी इस्रायल देशाची घोषणा केली. त्यानंतर पॅलेस्टीनींकडून युद्धाला सुरुवात झाली. या युद्धानंतर बहुतांश प्रदेश इस्रायलकडे गेला.

१९६७ साली इस्रायल-पॅलेस्टीनींमध्ये पुन्हा युद्ध झाले. इस्रायलने पूर्व जेरुसलेम आणि पश्चिम किनारपट्टीवर ताबा मिळवला. हे युद्ध झाल्यानंतर युद्धातील स्थलांतरीतांना पुन्हा घरे देण्यास इस्राइलने नकार दिला. मात्र, गाझा प्रदेशावर सध्या पॅलेस्टीनींचा तर पश्चिम किनारपट्टीवर इस्राइलचा ताबा आहे. मात्र, सध्या इस्त्रायलच्या ताब्यात असलेला जेरुसलेम हा आमचा असल्याचे पॅलेस्टीनी म्हणतात.१९८२ या वर्षी पॅलेस्टीनींना हाकलण्यासाठी इस्रायलने लेबॅनॉनवर हल्ला केला.१९९३ या वर्षी इस्रायल-पॅलेस्टीनींमध्ये ओस्लो करार झाला. हा करार हमासने अमान्य केला.२००५ या वर्षी इस्रायलने गाझा पट्टीतून माघार घेतली.

गाजा संघर्षाचा इतिहास
गाझा पट्टी 41 किमी लांब आहे आणि 10 किमी रुंद आहे. या पट्ट्यात साधारण 19 कोटी लोक राहतात. भूमध्य सागर, इस्रायल आणि इजिप्तनं या भागाला वेढलं आहे.

गाझा पट्टीवर आधी इजिप्तचा ताबा होता. 1967 सालच्या मध्यपूर्व युद्धात इस्रायलनं या भागावर ताबा मिळवला. आणि इस्रायलनं 2005मध्ये या भागातून आपलं सैन्य आणि जवळपास 7,000 लोकांना मागे घेतलं. हा

प्रदेश पॅलेस्टिनियन प्रशासनाच्या ताब्यात आहे. पण 2007 ते 2014च्या काळात हा भाग हमास या कट्टरवादी संघटनेनं बळकावला होता. 2006मध्ये पॅलेस्टिनियन विधिमंडळाच्या निवडणुका हमासनं जिंकल्या. पण फताह या गटाबरोबर त्यांचं वैमनस्य अगदी हिंसाचाराच्या पातळीवर होतं.

जेव्हा हमासनं या भागावर ताबा मिळवला तेव्हा इस्रायलनं या भागावर लागलीच बंधनं घातली. वस्तू आणि लोकांची ने-आण बंद करण्यात आली. त्याचवेळी इजिप्तनं गाझाच्या दक्षिण सीमेवर नाकाबंदी केली.

हमास आणि इस्रायल यांच्यात 2014मध्ये मोठा संघर्ष झाला. गाझामधून होणारे रॉकेट हल्ले थांबवण्याचा प्रयत्न इस्रायल करत होता तर कट्टरवादी हमास त्यांच्यावरील बंधनातून बाहेर येण्याचा प्रयत्न करत होते.

 

 

गाझा पट्टी या भागात इस्रायलच्या परवानगीशिवाय कोणीही प्रवेश करू शकत नाहीत. संयुक्त राष्ट्र संघाने अनेक वेळा इस्रायलला गाझावरील हा बेकायदा कब्जा हटवायला सांगितले, पण इस्रायलने त्यांचे कधीच ऐकले नाही. संयुक्त राष्ट्र संघाने इस्रायलच्या विरोधात ठराव मंजूर केले आहेत पण अमेरिकेचा पाठिंबा असल्यामुळे त्यांनी याची कधीही पर्वा केली नाही. अन्न आणि इतर अत्यावश्यक वस्तूंची गाझात नेहमी कमतरता असते कारण इस्रायल नेहमीच या वस्तूंच्या आयातीला अडथळा आणून त्रास देत उशीर करत असतात.

 

 

गाझातील बालकांचा जगातील कुपोषित बालकांमध्ये वरचा क्रमांक येतो. गंभीर जखमा किंवा रोगांवर इलाज करण्यासाठी तेथील रुग्णालयांत तज्ज्ञ डॉक्टर्स किंवा साहित्य उपलब्ध नाहीत.

 

 

 

 

जगातील लोकभावना जरी पॅलेस्टाइनला सहानुभूती दर्शवणारी आणि इस्रायलच्या आक्रमणाचा विरोध करणारी असली तरी भारतात मात्र इस्रायलसाठी सहानुभूती असणारी विचारसरणी सध्या बोलकी झालेली दिसते आहे. अर्थात याला जबाबदार सध्या सत्तेवर असलेल्या सरकारचा मुस्लिम विरोधी पवित्रा.

वांशिक किंवा धार्मिक श्रेष्ठत्व हे निरर्थक असून मानवता महत्त्वाची आहे ही वस्तुस्थिती जगातील सर्व धर्म आणि वंशात पसरलेल्या अतिरेकी विचासरणीच्या लोकांनी समजून घेऊन अमलात आणणे आवश्यक आहे! तूर्तास इतकेच!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here