एसीसी सिमेंट कंपनीविरोधात एकवटले उसगाव, नकोडा व घुग्घुसचे ग्रामस्थ
उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु न केल्यास आंदोलनाचा इशारा
पंकज रामटेके / विशेष प्रतिनिधी
घुग्घुस:येथून जवळच असलेल्या एसीसी सिमेंट कंपनी ते उसगाव पर्यंतच्या रस्त्याची गुरुवार २२ फेब्रुवारी रोजी जिल्हा परिषद चंद्रपूरचे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे,उपविभागीय अधिकारी रंजित यादव, तहसीलदार विजय पवार, भाजपा जिल्हा महामंत्री विवेक बोढे,काँग्रेस नेते रोशन पचारे, माजी जि.प.सभापती नितु चौधरी, नकोडा सरपंच किरण बांदूरकर, उसगाव सरपंच निविता ठाकरे, न.प.चे मुख्याधिकारी जितेंद्र गादेवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रकाश अमरशेट्टीवार, संध्या बोधनवार, प्रभारी ठाणेदार प्रशांत साखरे व उसगाव, नकोडा आणि घुग्घुसच्या ग्रामस्थांनी पाहणी केली.
उसगाव येथील ५० ते ६० वर्षापासून सुरु असलेला रस्ता ग्रामपंचायतची पूर्वपरवानगी न घेता तसेच गावकऱ्यांना विश्वासात न घेताच एसीसी कंपनीने बंद केला. हा रस्ता माउंट कार्मेल शाळा तसेच उसगावं वासियांचा मुख्य रस्ता होता. या मार्गावर एसीसीने अवैध कोल व राख डेपो सुरू केला आहे. या राखेचा धूळ मोठ्या प्रमाणात उडून शाळेत येतो. या धुळीमुळे विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. शाळेत धुळच धूळ साचला आहे. श्वसनाचे आजार विद्यार्थ्यांना होत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागा चा रस्ता ACC कंपनीने अवैद्यरित्या बंद केल्यामुळे उसगाव, नकोडा व घुग्गुस ग्रामवासियांत तीव्र असंतोष पसरला.
त्याअनुषंगाने यासंदर्भात उसगाव येथे प्रशासनाची, उसगाव, नकोडा घुग्घुस ग्रामस्थांची आणि एसीसी कंपनी व्यवस्थापनाची बैठक पार पडली. बैठकीत दोन दिवसात प्रशासनातर्फे उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. याप्रसंगी बोलतांना जिल्हा परिषद माजी अध्यक्ष देवराव भोंगळे म्हणाले की उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु करण्यासाठी एसीसी सिमेंट कंपनीला प्रशासनातर्फे आदेश देण्यात आले होते परंतु एसीसी सिमेंट कंपनीने मुजोरी करीत हा रस्ता सुरु केला नाही. एसीसी सिमेंट कंपनीची दडपशाही कदापी सहन केली जाणार नाही. दोन दिवसात उसगावचा रस्ता पूर्ववत सुरु केला नाहीतर एसीसी सिमेंट कंपनीविरुद्ध आंदोलन करण्यात येईल.
यावेळी घुग्घुसचे माजी सरपंच संतोष नुने, नकोडा उपसरपंच मंगेश राजगडकर, काँग्रेस नेते प्रेमानंद जोगी, माजी पं. स. सभापती वर्षा ताजने, सिनू इसारप, साजन गोहने, वैशाली ढवस, विनोद चौधरी, धनंजय ठाकरे, रत्नेश सिंग, शाम आगदारी, श्रीकांत सावे, मानस सिंग, तुलसीदास ढवस, विनोद जंजर्ला, वमशी महाकाली,विवेक (गुड्डू) तिवारी व मोठया संख्येत नागरिक उपस्थित होते.