आम्ही घरीच राहु पण लस घेणार नाही…

0
447

आम्ही घरीच राहु पण लस घेणार नाही…
आमचे राशन पानी बंद केले तरी चालेल
◆चंद्रपूर जिल्ह्यात खुटाळा येथे गावकऱ्यांचा लस घेण्यास नकार
◆ लसीकरणा बाबतच्या अफवेने गावकरी घाबरले
चिमूर, आशिष गजभिये : कोरोनाचा संसर्ग रोखायचा असेल तर ठरवून दिलेल्या वयोमर्यादेत नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक आहे. याकरिता लसीकरणासाठी ग्राम स्तरापासून तर राज्य स्तरापर्यंत व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. मात्र दुसरीकडे लस घेण्याबाबत उलट सुलट अफवा पसरविण्यात येत असल्यामुळे काही ठिकाणी नागरिक लस घेण्यास पुढे येत नसल्याचे चित्र पहायला मिळत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातील खुटाळा या गावी लस घेतली तर जीवितास धोका निर्माण होतो असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरल्यामुळे येथील नागरिकांनी लसीकरणाला नकार दिलेला आहे. ग्रामस्तरावरील कार्यरत यंत्रणेतील अधिकारी कर्मचारी तसेच आरोग्य कर्मचारी येथील नागरिकांना लसीचे फायदे पटवून देत आहेत. मात्र नागरिक कोणतीही कारवाई झाली तरी चालेल पण लस घेणार नाही या भूमिकेत असल्याने प्रशासनाचे या गावाकडे लक्ष लागले आहे. सध्या 45 वर्षवयोगटाच्या वरील नागरिकांना लस घेण्याची सुविधा आहे तर 1 मे पासून 18 वर्षावरील सर्वांना लसीकरणाची सुविधा निर्माण होत आहे. त्यामुळे येत्या दिवसात खुटाळा येथील नागरिक लसीकरणासाठी तयार होतात का ? किंबहुना प्रशासन काय करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
देशभरात दुसऱ्या टप्यातील कोरोना लसीकरण मोहीम सुरू झाली आहे. 65 वर्षापुढच्या नागरिकांसाठी आणि ज्यांना इतर काही मोठे आजार आहेत अशा 45 पेक्षा जास्त वय असलेल्या नागरिकांना लस दिली जाते आहे. मात्र खुटाळा येथील गावकरी लस घेण्यास नकार दर्शवत असून, आम्ही लस घेणार नाही अशा इशारा ग्रामपंचायतला दिला आहे. चिमूर तालुक्‍याच्या ठिकाणापासून सोळा किलोमीटर अंतरावरील खुटाळा हे गाव आहे तर लसीकरणाचे केंद्र असलेल्या नेरी पासून सहा किलोमीटर अंतर आहे. सुमारे सतराशे लोकसंख्या असलेल्या गावातील आंगनवाडी सेविका व आशा वर्कर वगळता आतापर्यंत येथील फक्त 3 लोकांनी कोरोना लस घेतल्याचे समजते. येथे दोघांजणांची प्रकृती बिघडल्याने त्यांची कोविड चाचणी करण्यात आली असता ते पॉझिटिव्ह आले. त्यांचेवर घरीच उपचार सुरु आहे.
सध्या विविध माध्यमाद्वारे लसीकरणाबाबत मेसेजेस पोस्ट केल्या जात आहे त्यामध्ये काही चांगले तर काही दुष्परिणाम होणाऱ्या मेसेजच्या समावेश आहे शिवाय ग्रामस्तरावर वेगवेगळ्या माध्यमातून होणाऱ्या चर्चा ही कारणीभूत ठरत आहेत त्यामुळे चिमूर तालुक्यातील खुटाळा या गावातील नागरिकांमध्ये लस घेण्याबाबत चांगलाच संभ्रम निर्माण झाला आहे. कोरोणा संसर्ग रोखण्यासाठी फायदेशीर असलेली लस घेतल्याने माणसाचा जीव जातो. कर्मचाऱ्यांना वेगळीच लस दिली जाते व सर्व सामन्यांना वेगळीच लस दिली जाते. ही लस घेतल्यानंतरही कोरोना होऊन नागरिकांचा जीव जातो. असा गैरसमज नागरिकांमध्ये पसरला आहे.
गावकऱ्यांच्या हा संभ्रम दूर करण्यासाठी ग्रामपंचायत मार्फत घरोघरी जाऊन जनजागृती करण्यात आली. मात्र, तरीही नागरिक नकारात्मक प्रतिक्रिया देत आहेत. आम्ही घरीच राहू पण लस घेणार नाही, आमचे राशन, पाणी बंद केले तरी चालेल अशाही प्रतिक्रिया नागरिकांकडून ऐकायला मिळत आहेत.
==========
गावक-यांमध्ये कोरोना लस बाबत संभ्रम निर्माण होऊन, भीतीचे वातावरण पसरले आहे. नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी न पडता स्वतः समोर येऊन कोरोना लस घ्यावी. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यास मदत होईल.
मंजुषा ढोरे
सचिव ग्रामपंचायत खुटाळा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here