वीज ग्राहकांना महावितरणाचा दुहेरी शॉक

0
570

वीज ग्राहकांना महावितरणाचा दुहेरी शॉक

भारनियमन पाठोपाठ, एकाच महिन्यात ग्राहकांना दोन वीज बिले

वीज बिलांमुळे नागरिक हैराण

 

 

कोरपना/प्रतिनिधी :विज वितरण कंपनीने लादलेल्या भारनियमनाच्या निर्णयाने आधीच भांबावलेल्या नागरिकांना आता महावितरण कंपनीने दुहेरी विज बिल देऊन हादरवून सोडले आहे .अतिरिक्त सुरक्षा रक्कम भरायची कुठून हा सामान्य नागरिकांसमोर गहन प्रश्न आहे .

 

वीज कंपनी तर्फे एका महिन्याचे एकच वीज बिल येत असते. मात्र चालू महिन्यात म्हणजेच एप्रिल महिन्यात प्रत्येक ग्राहकाला महावितरण तर्फे दोन वीज बिल देण्यात आल्याने नागरिक संभ्रमात आहेत. एक नियमित (रेग्युलर )वीज बिल आहे तर दुसरे अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीज बिल आहे. हे दोन्ही वीज बिले एकाच वेळी नागरिकांना मिळाल्याने तालुक्यातील वीज ग्राहक संतप्त झाले आहेत.आता हे रेग्युलर वीज बिल व दुसरे बिल अतिरिक्त सुरक्षा रकमेचे वीज बिल आता कसे भरायचे, पैसे कुठून आणायचे या विवंचनेत सर्वसामान्य माणूस सापडला आहे. महागाईत सर्वात मोठा झटका वीज बिलांचा सर्वसामान्य ग्राहकांना बसल्याने एकाच वेळी दोन वीज बिले पाठवून महावितरण कपंनीने ग्राहकांना एकप्रकारे शॉकच दिला आहे.

 

वीज ग्राहक प्रत्येक महिन्याला वीज बिल घरातील वीजपुरवठा खंडित होऊ नये या धास्तीने वीज बिल दरमहा नियमित पणे भरत असताना अतिरिक्त सुरक्षा रक्कम घेणे गरजेचे वाटत नाही, एक प्रकारे वीज ग्राहकांवर अन्याय करणारे आहेत असे ग्राहकांचे म्हणणे आहे.

 

कोरोनामुळे नागरिकांच्या घरची परिस्थिती अजूनही सुधारलेली नाही. त्यातच महागाई दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. आर्थिक घडी अजूनही व्यवस्थित बसलेली नसताना अचानक महावितरण कपंनीने एकाच वेळी दोन वीज बिले पाठवून ग्राहकांचे कंबरडेच मोडले आहे. एक बिल रेग्युलर आहे तर दुसरे वीज बिल सुरक्षा रकमेच्या नावाखाली देण्यात आलेले आहे. मात्र सुरक्षा रकमेच्या नावाखाली अव्वाच्या सव्वा रुपये महावितरण ग्राहकांकडून वसुल करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.

 

कोरोना संपतो न संपतो तोच महागाईने डोके वर काढले आहे. महागाईला कंटाळून गेलेल्या नागरिकांना वीज बिलांचा शॉक बसल्याने नागरिक पूर्णपणे कंटाळले असून महावितरणाच्या कारभारावर नागरिक नाराज आहेत. अगोदरच महावितरण वीज विक्रीकर, स्थिर आकार, वीज आकार, वहन आकार,इंधन समायोजन आकार, वीज शुल्क, आदी भरमसाठ आकार(कर)महावितरण वीज बिलांच्या नावाखाली ग्राहकांच्या माथी मारत आहे. आता तर दोन बिले मिळाल्याने नागरिकांना एकच जोरात शॉक बसला आहे.

 

वीज बिल नाही भरले तर वीज तोडण्यात येईल असे महावितरण कंपनी कर्मचाऱ्यांमार्फत ग्राहकांना सांगण्यात येते. त्यामुळे वीज ग्राहक घाबरून वीज बिले भरत आहेत. तर अनेक ग्राहकांचे मीटर बंद असूनही त्यांच्या माथी सरासरी वीज बिल मारण्यात आले आहे. नवीन मीटर उपलब्ध करून मीटर बदलून देण्याची मागणी केली असता तेही वेळेत उपलब्ध होत नसल्याने महावितरण ग्राहक या सर्व गैर सुविधेमुळे पूर्णपणे वैतागला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here