अकोल्यात कोरोनाचा विसर…आदिवासी आंदोलनात कोरोना बाबत बेफिकिरी…

0
448

अकोल्यात कोरोनाचा विसर…आदिवासी आंदोलनात कोरोना बाबत बेफिकिरी…

अहमदनगर

ज्ञानेश्वर गायकर पाटील.

आपल्या विविध मागण्यांसाठी अकोले तहसील कार्यालयासमोर आदिवासी, कामगार, कर्मचारी, निराधार व शेतकऱ्यांच्या मागण्यासाठी दोनशे श्रमिकांनी ठिय्या आंदोलन सुरू केले असून, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष व जनसंघटनांनी आदिवासी व श्रमिकांच्या मूलभूत प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र, अकोले तहसीलदार मुकेश कांबळे यांची धुळे येथे पुरवठा अधिकारी म्हणून बदली झाल्याने ,सध्या तरी आंदोलक वाऱ्यावर आहेत. मात्र आंदोलन सुरू असताना तहसीदार एका खासगी कार्यक्रमाला निघून गेल्याचा आरोप आंदोलकांनी केला असून हा आरोप तहसीलदार मुकेश कांबळे यांनी फेटाळला आहे. त्यामुळे शांततेत सुरू असलेले आंदोलन अचानक आक्रमक झाले. त्यांनी तहसीलदारांच्या कक्षाकडे धाव घेतली. आंदोलकांनी तहसील कार्यालयाचे गेट तोडून आत प्रवेश केला. पोलिसांनी त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना न जुमानता आंदोलक थेट कक्षात शिरले. तेथे जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. अधिकारी येईपर्यंत बेमुदत ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. या मागण्यांची प्रशासनाने तड न लावल्यास ११ ऑगस्टला पुन्हा मोर्चा काढून तहसील कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशाराही देण्यात आला.

कोरोनाचा मात्र पूर्ण विसर या आंदोलकांना पडला असून, कोणते ही निर्बंध आंदोलक यांनी पाळले नाहीत. या बाबत पोलीस नेमकी काय कारवाई करतात या कडे तालुक्याचे लक्ष असून ,असेच दोन कार्यक्रम अकोल्यात आदिवासी दिनाच्या दिवशी झाल्याचे आजी व माजी आमदार यांच्या बाबत ही पोलीस कोणती भूमिका घेतात या कडे लक्ष लागले आहे. दरम्यान पत्रकारांशी बोलताना शेतकरी नेते डॉ. अजित नवले म्हणाले, आदिवासी दिनाच्या निमित्ताने आदिवासींच्या भावनांशी खेळायचे आणि नंतर आदिवासींच्या मूलभूत प्रश्नांकडे अक्षम्य दुर्लक्ष करायचे अशी संतापजनक परिस्थिती सध्या तालुक्यात दिसते आहे. रेशनचा काळाबाजार करून आदिवासींच्या अन्नात माती कालवायची, आदिवासींना जंगलच्या जमिनीवर अधिकार नाकारायचे, बांधकाम कामगार, अर्धवेळ परिचर, आशा कर्मचारी, घरेलू कामगार, अंगणवाडी कर्मचारी, विधवा, परित्यक्ता व निराधार वृद्धांना शासकीय योजना, वेतन व सामाजिक सुरक्षेपासून वंचित ठेवायचे. शासन व प्रशासनाचे हे अन्यायकारक उद्योग मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष सहन करणार नाही.

या आंदोलनात सदाशिव साबळे, नामदेव भांगरे, एकनाथ मेंगाळ, जुबेदा मणियार, आराधना बोऱ्हाडे, प्रतिभा कुलकर्णी, संगीता साळवे, तुळशीराम कातोरे, भरती गायकवाड, सविता काळे, राजाराम गंभीरे, प्रकाश साबळे, अविनाश धुमाळ, संदीप शिंदे, खंडू वाकचौरे, मथुराबाई बर्डे, नंदू गवांदे, साहेबराव घोडे, भाऊसाहेब मेंगाळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो आदिवासी व श्रमिक सहभागी झाले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here