बल्लारपूर नगरपालिकेच्या दुर्लक्षपणामूळे आरोग्य व्यवस्था ढेपाळली राजु झोडेंनी केला आराेप, दिवसांगणिक रुग्ण संख्येत वाढ!
बल्लारपूर (चंद्रपूर), किरण घाटे वि.प्र. – विदर्भाच्या चंद्रपूर जिल्ह्यात औद्योगिक नगरी म्हणून आेळख असणां-या बल्लारपूर शहरात अक्षरशा डेंगू मलेरियाने थैमान घातले असून रुग्णालयात रुग्णांची दिवसांगणिक गर्दी वाढु लागल्याचे चित्र सध्या द्रूष्टीक्षेपात पडु लागले आहेत. डेंगु मलेरिया या राेगामुळे कित्येक रुग्णांचे प्राण देखिल जात आहेत. तरी ही नगरपालिका प्रशासन याकडे दुर्लक्ष करून झोपेचे सोंग घेत आहे असा स्पष्ट आरोप वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी आज (गुरुवारला ) केला.
शहरात जीवन प्राधिकरण व बांधकाम विभागाच्या ढिसाळ कामामुळे शहरात जागोजागी खड्डे पडलेले असून त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घाण साचलेली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असुन नागरिकांना व व्यापारी वर्गांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे. एव्हढेच नाही तर या खड्ड्यात घाण पाणी साचल्यामुळे डासांचे प्रमाण वाढलेले असून नगरपालिका कोणतीही उपाययोजना करताना दिसत नाही. नपाच्या दुर्लक्ष पणामुळे नागरिकांचे डेंगू मलेरियाने प्रचंड हाल होत असून यावर प्रभावी उपाययोजना नगरपालिकेने करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडीने केली आहे.
नगरपालिका, बांधकाम विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या तिघांनी मिळून बल्लारपूर शहरातील सुंदर रस्ते फोडून पाईप लाईनचे काम आरंभ केले. काम केल्यानंतर जसेच्या तसे रस्त्यावरील खड्डे ठेवल्यामुळे सांडपाण्याचा निचरा होत नाही. त्यामुळेच शहरभर घाणीचे साम्राज्य वाढले आहे. याला सर्वस्वि नगरपालिका प्रशासन जबाबदार असून कुचकामी नगराध्यक्ष फक्त बघ्याची भूमिका घेताना दिसत आहेत. या बाबत तातडीने उपाययोजना करुन लवकरात लवकर रस्त्यावरील खड्डे बुजवून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी अन्यथा वंचित बहुजन आघाडी या विरोधात तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी नगरपालिका प्रशासनाला दिला आहे. दरम्यान प्रशासनाला निवेदन सादर करतांना वंचितचे नेते राजू झोडे, संपत कोरडे, सचिन पावडे, जाकीर खान, स्नेहल साखरे, गुरु कामटे, भास्कर कांबळे, प्रदीप झामरे, निरज शेंडे आदींची उपस्थिती होती.