आष्टी येथील ठाणेदाराने पोलीस शिपायाच्या पत्नीचा केला विनयभंग
चामोर्शी तालुक्यातील उप पोलीस स्टेशनचे पोलीस ठाणेदार यांनी केला वर्दीचा अपमान
आदिवासी दाम्पंत्याने लावली आहे न्यायासाठी हाक
सुखसागर झाडे । सदरक्षणायं, खलनिग्रहणायं… असे ब्रीद पोलिसांच्या खाकी वर्दीवर लावलेले आहे. याचा अर्थ सामान्य जनतेला सुरक्षित ठेऊन खलवृत्तीने वागणाऱ्यांना ठेचण्याचे व वठणीवर आनण्याचे काम पोलिसांनी करणे अपेक्षित आहे. मात्र पोलीस खात्यातील काही कर्मचा-यांना याचा विसर पडलेला दिसतो आहे.
पती-पत्नीमधील कौटुंबिक भांडण सोडविण्यासाठी आपल्या ठाणेदाराला वडीलधारे म्हणून पोलिस शिपायाने घरी पाचारण केले असता ठाणेदाराने कौटुंबिक भांडण सोडविण्याऐवजी शिपायाच्या पत्नीचा हात धरून शरीर सुखाची मागणी केली व विनयभंग केल्याची तक्रार आष्टी पोलीस स्टेशन मध्ये कार्यरत पोलिस शिपाई व त्याच्या पत्नीने गडचिरोलीच्या अतिरिक्त पोलीस अधीक्षक समीर शेख यांचेकडे केली आहे. या घटनेमुळे पोलिस विभागात मोठी खळबळ उडाली आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयात सदर तक्रार नोंदविण्यासाठी पिडीता व तिच्या पतीचे आवश्यक बयान नोंदवून घेतले असुन चौकशी सुरू केली आहे.
स्वतः पिडीतेने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयात बयान दिल्यानंतर कार्यालया समोरच प्रसिद्धी माध्यमांसमोर आपबीती सांगितली.
ठाणेदार जेव्हा दुपारी घरी आले तेव्हा पतीला घराबाहेर ठेऊन तिचे एकटीसोबत बोलून तिला समजावीतो असे सांगितले. आणि घरात आल्यानंतर काही वेळ चर्चा केली. थोड्याच वेळात माझ्या हातावर आपला हात ठेवत त्यांनी शरीरसुखाची मागणी केली. मी नकार दिल्याने नंतर फोनवर बोलतो म्हणून बाहेर ऊभे असलेल्या माझ्या पतीला घेऊन पोलीस स्टेशन येथे गेले. पती घरी आल्यानंतर मी त्यांना घडलेली हकीकत सांगितली. त्यानंतर आम्ही तक्रार करण्यासाठी आष्टी पोलीस स्टेशन मध्ये गेलो. परंतु आमची कैफियत नोंदवून न घेता आम्हालाच धमकावले. त्यानंतर आम्ही घरी आलों व गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात जाण्याचा निर्णय घेतला व तयारी केली. हे ठाणेदाराला कळताच काही पोलीस पाठवून आम्हाला जाण्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र आम्ही निर्णयावर ठाम राहून गडचिरोली कडे रवाना झालो यावेळी ठाणेदाराने रस्त्यात आमची गाडी थांबवून माझ्या पतीला जबरदस्ती गाडीतून ऊतरवून घेऊन मी माझे बाबा व सोबत काही लोक मिळून रात्री गडचिरोली पोलीस अधीक्षक कार्यालयात आलो व आमची तक्रार नोंदविली. सकाळी माझ्या पतीला पोलीस अधीक्षक कार्यालयात बोलावुन त्यांचेही बयान घेण्यात आले. आम्ही ठाणेदारावर गुन्हा दाखल करून त्यास अटक करावी अशी मागणी केली आहे.