महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रतिमा अवमानना व मणिपूर घटना निषेधार्थ चंद्रपुरात जनआक्रोश मोर्चा
चंद्रपूर : मणिपूर येथील अत्याचाराच्या घटनेवरून संपूर्ण देशात जनआक्रोश निर्माण झाला आहे. या घटनेचा देशभरात निषेध होत असून, सोमवारी चंद्रपुरात विविध सामाजिक संघटनांच्या नेतृत्वात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्त्या डॉ. अभिलाषा गावतुरे, हिराचंद बोरकुटे, जितेश कुळमेथे यांनी चंद्रपूर श्रमिक पत्रकार भवनात आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
मणिपूर येथे महिलांची नग्न धिंड काढून अत्याचार केल्याच्या प्रकरणाची चित्रफित समाजमाध्यमावर व्हायरल झाल्याने संपूर्ण देशभरात संतापाची प्रचंड लाट उसळली आहे. विशेष म्हणजे घटनेच्या दोन ते तीन महिन्यांनतर ही घटना उजेडात आली. तोपर्यंत स्थानिक राज्यसरकार, केंद्र सरकारने कोणतीही भूमिका घेतली नाही. यावरून मणिपूर आणि केंद्र सरकार महिलांच्या सुरक्षेविषयी किती असंवेदशील आहेत, अशी टीका डॉ. गावतुरे यांनी याप्रसंगी केली.
तर चंद्रपुरातील दुर्गापूर पोलीस ठाणे हद्दीतील एका दारूच्या दुकानातील शौचालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची प्रतिमा असलेले बॅनर लावून डॉ. बाबासाहेबांची अवमानना केल्याची घटना काही दिवसांपूर्वी उजेडात आली. देशाला संविधान देणाऱ्या महामानवाची अशी अवमानना निंदनीय असून, या घटनेचा निषेधही या जनआक्रोश मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार असल्याचे डॉ. गावतुरे यांनी सांगितले.
चंद्रपूर महानगरपालिकेच्या मैदानावरून सोमवार २४ जुलै रोजी दुपारी १२ वाजता मोर्चा प्रारंभ होणार आहे. जटपुरागेट मार्गे हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर धडकल्यानंतर मोर्चाचे सभेत रुपांतर होणार आहे. यावेळी एका शिष्टमंडळाद्वारे जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार आहे.
या मोर्चात चंद्रपूरकर नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले.
पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा बेबी उईके, शिवसेना महिला जिल्हा संघटक उज्वला नलगे, हिराचंद बोरकुटे, ॲड. वैशाली टोंगे, वनिता आसुटकर, भिम आर्मीचे सुरेंद्र रायपुरे, काँग्रेस च्या नेत्या अनुताई दहेगावकर, शिवसेना नेत्या कुसुम उदार, यंग चांदा ब्रिगेडचे जितेश कुलमेथे, नरेन गेडाम आदींची उपस्थिती होती.