लोकशाही वाचवायची असेल तर जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल – विचारवंत डॉ. प्रा. प्रल्हाद लुलेकर

0
937

लोकशाही वाचवायची असेल तर जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल – विचारवंत डॉ. प्रा. प्रल्हाद लुलेकर

राजुरा : देशात लोकशाहीची वर्तमान स्थिती अत्यंत वाईट आहे. सर्वसामान्य नागरिकांचे मूलभूत प्रश्न मागे पडले आहेत. सरकारी मालकीच्या अनेक स्वायत्त संस्था आपल्या अस्तित्वाकरिता केविलवाणी धडपड करताना दिसत आहेत. त्यामुळे लोकशाही वाचवायची असेल तर जातीधर्माच्या पलीकडे जाऊन विचार करावा लागेल. नागरिकांनी निव्वळ भावनिक न होता देश व लोकशाहीच्या रक्षणाकरिता निवडणुकीत स्पष्ट भूमिका बजवावी. शिवराय, फुले, शाहू, आंबेडकर यांना एका जातीत गुंतवून ठेवू नका. या महापुरुषांचे कार्य विशिष्ट एका जातीपूर्ते मर्यादित नव्हते. हे सर्व महापुरुष खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे नेते होते. आपण सर्व विविध क्षेत्रात उच्चांक गाठला. डॉक्टर, वकील, इंजिनियर, प्राध्यापक झालोत पण आजही खऱ्या अर्थाने माणूस होता आले नाही हि खंत आहे. असे स्पष्ट प्रतिपादन छञपती संभाजी नगर येथील ज्येष्ठ साहित्यिक तथा विचारवंत प्रा. डॉ. प्रल्हाद लुलेकर यांनी केले.

राजुरा येथे पुरोगामी विचार मंच द्वारा आयोजित स्वराज्य संस्थापक छञपती शिवाजी महाराज जयंती महोत्सव निमित्त एक दिवसीय व्याख्यान “शिवराय-फूले-शाहू-आंबेडकर” या विषयावर डॉ. लुलेकर बोलत होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. प्रा. वारकड श्री. शिवाजी महाविद्यालय राजुरा हे होते तर उद्घघाटक सेवानिवृत्त प्राचार्य दौलत भोंगळे हे होते. राज्यघटनेचा सरनामा बघितला तरी डॉ. आंबेडकरांनी केवळ दलितांच्या नव्हे तर समाजातील सर्वच उपेक्षित आणि दुर्बल घटकांच्या कल्याणाकरिता जास्तीत जास्त तरतुदी केलेल्या आहेत. स्त्रियांना नेहेमी आदर सन्मानाने वागवले पाहिजे असेही मत त्यांनी यावेळी मांडले. शेतकऱ्यांसाठी महात्मा फुले यांच्यानंतर बाबासाहेबांएवढे काम कोणीही केले नाही. आपल्या सर्वच संशोधन व साहित्यामध्ये त्यांनी आर्थिक, सामाजिक व राजकीय विषय मांडले. तेव्हां बाबासाहेब फक्त दलितांचेच कैवारी कसे होऊ शकतात, असा परखड सवाल प्रा. डॉ. लुलेकर यांनी उपस्थित केला. शाहू महाराज आणि शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला. व्याख्यानपर्वाचे प्रास्ताविक मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष दिनेश पारखी यांनी केले. संचालन नागवंश युथ फोर्स राजुराचे प्रणित झाडे आणि मुसा शेख यांनी आभार मानले.

कार्यक्रमाची सुरुवात ऍड. मारोती कुरवटकर यांनी संविधानाच्या प्रस्ताविकेचे वाचन करून केले. प्रमुख मार्गदर्शकांच्या व्याख्यानानंतर तालुक्यातील शिव जयंती उत्सव समिती व मंडळाचे प्रशस्ती पत्र व पुस्तकं भेट देऊन त्यांचा गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन नागवंश युथ फोर्स राजुरा, मराठा सेवा संघ राजुरा, भारतीय बौद्ध महासभा राजुरा,महात्मा ज्योतिबा फुले समाज सुधारक मंडळ राजुरा यांनी यशस्वी पणे पार पाडले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here