रमाई जयंती उत्सव समिती बल्लारपूर तर्फे रमाई व माईसाहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी
बल्लारपूर, 9 फेब्रु. : काल दि. 8 फेब्रुवारी 2023 ला रमाई जयंती उत्सव समिती, बल्लारपूर येथे रमाई व माईसाहेब जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दिवसभर महिलांनी विविध कार्यक्रम आयोजित केले.
यात गीतगायन, ‘मी रमाई बोलतेय’ हे एकपात्री नाटक सविता पानतावणे यांनी सादर केले. प्रबोधनाचे सत्र 4.30 ला सुरवात झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. जयप्रकाश तुंबडे सर होते. तर प्रमुख वक्ता म्हणून डॉ. शरयूताई पाझारे होत्या.
डॉ. शरयू पाझारे यांनी अनेक शिक्षित लोकांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना लिहिलेल्या संघटना माहिती नाहीत अशी खंत व्यक्त केली. तर भविष्यात आम्हाला नौकरीच्या भरोशावर न रहाता. स्वतःच्या शाळा, छोटे मोठे उद्योग उभारणे ही काळाची गरज आहे. तसेच अनेक लोक आपल्या स्टेजवर येऊन तुमची तारीफ करतात. तुम्ही हुरळून न जाता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे बौद्धमय भारताचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झटले पाहिजे. तसेच आमचे जास्तीत जास्त प्रतिनिधी राजकारणात गेले पाहिजे. त्यासाठी आपल्या संघटना मजबूत करा असे विचार मांडले.
अध्यक्षीय भाषणात डॉ. तुंबडे सर म्हणाले की, आपण सर्वांनी एकत्र येऊन आपले आपले संघटन मजबूत करणे ही काळाची गरज आहे. तेव्हाच आपण आपली प्रगती करु शकतो. तसेच अशा कार्यक्रमातून कुशल नेतृत्व निर्माण होत असते.
सायं 6 वाजता प्रा. वैशाली कवाडे व मैत्री ग्रुप यांनी ‘जागर’ या विनोदी नाटाकांतून सामाजिक समस्यांची मांडणी केली.
सायं 7 वाजता भिमदास नाईक आणि संच अमरावती यांचा रमाई व भिमगीतावर प्रबोधनाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला रमाई उत्सव समिती चे सर्व पदाधिकारी तसेच मोठ्या प्रमाणात प्रेक्षक उपस्थित होते. हा कार्यक्रम बेघर जनकल्याण ग्रुहनिर्माण सहकारी संस्थेच्या पटांगणावर शांततेत पार पडला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. महेंद्र बेताल, सत्यभामा भाले, सुप्रिया चंदनखेडे, वत्सलाबाई तेलंग, प्रतिभा धोटे, झाडे ताई व सर्व रमाई जयंती उत्सव समिती पदाधिकारी यांनी खूप परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. या कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.