अन्यायाने व बळजबरीने विद्युत खांब पाडून गावकऱ्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करा…
बेरडी (जुनी) वासीयांची मागणी
राजुरा : बेरडी (जुनी) येथील रहिवासी झोपेत असतांना रात्री 11 वाजताच्या सुमारास गावातील विद्युत खांब अचानक पाडण्यात आले. गावकरी जनतेला सुरक्षेकरिता या कृत्याची कोणतीही पूर्वसूचना देण्यात आली नाही. यामुळे हे कृत्य करणारे केपीसीएल कन्ट्रक्शन कंपनी पुणे, पाटबंधारे विभाग चंद्रपूरचे अभियंता तुषार डोंगरे, विरुर स्टेशन येथील ट्रॅक्टर मालक पप्पू पठाण व चिंचाळा येथील ट्रॅक्टर मालक विनोद मडावी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्याची मागणी बेरडी (जुनी) येथील गावकरी जनतेने विरुर स्टेशन पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांच्याकडे केली आहे.
सदर गावातील जनतेला कसलीही लेखी व तोंडी सूचना न देता संबंधितांनी ट्रॅक्टरच्या साहाय्याने गावातील उभे विद्युत खांब रात्रीला पाडले. यामुळे गावातील नागरिक व पाळीव प्राणी यांचा जीव गमावण्याची दाट शक्यता होती. मात्र सुदैवाने कसलीही जीवित हानी झाली नाही. असे बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे अशी रास्त मागणी गावकरी जनतेने केली आहे.
सदर मागणीची तक्रार करताना तुळशीराम किन्नाके, मधुकर किन्नाके, विलास सोयाम, सुनील मडावी, गंगाधर आदे, सुनील गेडाम, मारोती मेश्राम, मारोती मडावी, संजय टेकाम, रोशन तोडासे, योगीदास आरके, सुदर्शन तोडासे, सुनील शेंडे, रविदास जुमनाके, नंदकिशोर तोडासे, जितेंद्र मोहूर्ले, अरविंद सोयाम, रवींद्र आदे, दिवाकर आत्राम, सुरेश आत्राम, पंढरीनाथ तोडासे, राजू तोडासे, दिलीप आत्राम, आशिष आत्राम, संकेत आदे, मारोती सोयाम सह आदी गावकरी नागरिक उपस्थित होते.