राष्ट्रीय महामार्गावर वरूर रोड ते सोंडो दरम्यान जीवघेणे खड्डे ; प्रशासनाने लक्ष देण्याची नागरिकांची मागणी
राजुरा : राजुरा ते आदीलाबाद ला जोडला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील वरूर रोड ते सोंडो दरम्यान मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहे. या महामार्गाचे नुकतेच पाच ते सहा महिण्याअगोदर दुरुस्तीकरण करण्यात आले. मात्र पावसाळ्यात या महामार्गाची दयनीय अवस्था झाली असून मोठमोठे खड्डे पडले आहे. यामुळे संबंधित विभागाच्या पारदर्शक कामाची पोच पावती मिळाली असून कामाचा निकृष्टपणा चव्हाट्यावर आला आहे. खड्ड्यामधून रस्ता शोधत प्रवाशांना प्रवास करावा लागत असल्याने या महामार्गाची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे.
तेलंगणा राज्याला जोडणारा हा राष्ट्रीय महामार्ग राजुरा तालुक्यातुन आदीलाबादला जातो. या मार्गावर अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते. यामुळे खड्डे चुकवून रस्ता शोधण्याच्या कसरतीत चालकाला बरीच कसरत करावी लागत आहे. या खड्ड्यात पाणी साचल्याने अनावधानाने अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. लोकप्रतिनिधींनीही याकडे लक्ष देऊन संबंधित विभागाला सूचना द्याव्यात अशी मागणी जनतेतून केली जात आहे.
वरूर रोड व सोंडो दरम्यान महामार्गावर पडलेले जीवघेणे खड्डे तातडीने बुजविणे गरजेचे आहे. या राष्ट्रीय महामार्गावर ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठ्या अपघाताला सामोरे जावे लागत असून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. भविष्यात होणारे अपघात टाळण्यासाठी संबंधित प्रशासनाने तातडीने खड्डे बुजवावे व प्रवाशांना होणार नाहक त्रास थांबवावा अशी मागणी केली जात आहे.