आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात आ. संजय राठोड यांचे सपत्नीक श्रमदान
आर्णी तालुक्यातील जांब येथे शेतात कृषी दिन साजरा
आर्णी/प्रतिनिधी : यवतमाळ पासून ३५ किमी अंतरावर वसलेल्या जांब या लहानशा गावात आ. संजय राठोड यांनी सामाजिक उत्तरदायित्वाच्या भावनेतून एका आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात सपत्नीक श्रमदान करून माणुसकीचा परिचय देत कृषी दिन साजरा केला. यावेळी त्यांनी शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, कुणीही संकटांमुळे आत्महत्येसारखा विचार मनात आणून कुटुंबाला उघड्यावर पाडू नका, अशी भावनिक साद यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना घातली.
कृषी दिनी लोकप्रतिनिधीने शेतकऱ्याच्या शेतात जाऊन त्याला मदत करावी अशी घटना जिल्ह्यात प्रथमच घडली. शासनासह सर्व समाजिक, राजकीय संघटनांनी हरितक्रांतीचे प्रणेते, राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांची जयंती अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतात प्रत्यक्ष काम करून साजरी केली पाहिजे, असे सांगत या भावनेतूनच आपण जांब येथे आज शेतकरी दिवस साजरा केला असे आ. संजय राठोड यावेळी बोलताना म्हणाले.
जांब येथील हितेश गणेश आडे या शेतकऱ्याने आत्महत्या केली. त्यामुळे त्याचे कुटुंबीय सैरभैर झाले. ना. राठोड यांनी या कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देत कृषी दिनाच्या निमित्ताने हितेशच्या शेतात जाऊन त्यांची आई मथुराबाई आडे, वडील गणेश आडे यांची विचारपूस करून माहिती जाणून घेतली. यावेळी हितेशच्या कुटुंबियांसमवेत शेतात संजय राठोड व शीतल राठोड यांनी श्रमदान केले. यावेळी आडे यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देण्यात आली. आडे कुटुंबातील महिलांना साडी चोळी भेट देण्यात आली.
संजय राठोड यांनी शेतात डोक्याला चक्क शेला बांधून डवरा चालवला. त्यांच्या पत्नी शीतल राठोड यांनी महिलांसोबत खत देत श्रमदान केले. हे दृश्य बघून गावकरीही अवाक् झालेत.
संजय राठोड यांनी यावेळी जांब येथील शेतकऱ्यांशी बोलून त्यांच्या अडचणी समजून घेतल्या.
संजय राठोड यांनी या शेतात दुपारी 1 ते ४ वाजेपर्यंत उपस्थित राहून श्रमदान केले व शिवसैनिकांसह शेतकरी दिवस साजरा केला. सर्व शिवसैनिक सायंकाळी उशिरापर्यंत या शेतात श्रमदान करीत होते. संजय राठोड यांच्यासोबत यावेळी त्यांच्या पत्नी शितल राठोड, प्रा. राजेश चव्हाण, उपजिल्हा प्रमुख प्रवीण शिंदे, तालुका प्रमुख रवी राठोड, पंचायत समिती सदस्य अनुप जाधव, राहुल लाभसेटवार, उत्तम राठोड, निखिल खारोल, अतुल देठे, बबलू देशमुख, पवन वाघमारे, सरपंच दिनेश पवार, रमेश आडे सहभागी झाले होते.
शिवसेना पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या जन्मदिनी म्हणजेच २७ जुलै रोजी यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना लोकप्रतिनिधी, पदाधिकारी अशाच प्रकारे अडचणीमध्ये आलेल्या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये जाऊन श्रमदान करणार आहेत. जवळपास एक हजार शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन श्रमदानातून मदत करून दिली जाईल, असे संजय राठोड यांनी यावेळी सांगितले. लोकप्रतिनिधी आपला परिवार घेऊन एका शेतकऱ्याच्या शेतात जाईल असे संजय राठोड म्हणाले.
“जणू माझा मुलगाच आला…!
माझ्या मुलाने आत्महत्या केली. त्यामुळे मी अंत्यत दुःखी होतो. आ. संजय राठोड साहेबांनी भेट दिल्यामुळे मी आनंदी झालो. मला काही क्षणासाठी असे वाटले की, माझा मुलगाच माझ्या सोबत आहे.”
शेतकरी