शिंदे यांचा मेळावा “फेल” का गेला…..

0
960

शिंदे यांचा मेळावा “फेल” का गेला…..

 

 

अहमदनगर (संगमनेर) ६/१०/२०२२

संपूर्ण देशाचे लक्ष काल मुंबईवर होते. मुंबईत नेमक काय होणार? कोण काय बोलणार , अन् कुणाची गर्दी अन् कुणाची दर्दि. एक बाब समोर आली “शिवतीर्थ” वर नक्कीच दर्दींची “गर्दी” दिसली, ती ही अफाट होती. मराठी, हिंदी, इंग्रजी, देशी ,परदेशी पत्रकार शिवतीर्थावर होते तसेच ते वांद्र्याच्या बी के सी वर ही होते. दोघांच्या गर्दीचे अन् भाषणाचे मूल्यमापन केले असून यात शिंदे “पूर्ण फेल” झाले असून, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी १०/१० गुण मिळवले आहेत. शिंदे यांच्या भाषणाची खिल्ली ही समाज माध्यमातून उडवली असून , अनेक वृत्त वहिनी , वृत्त पत्रे यांनी भाषण अन् गर्दी बाबत कौल मागितला असता ९९% जनतेने कौल उद्धव ठाकरे यांना दिला आहे. अखेर जन माणसातील लढाई काल उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी जिंकल्याचे चित्र स्पष्ट दिसतें.
शिंदे व अन्य चाळीस आमदार फुटून शंभर दिवस होत आहे.

राज्यात मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे तर उप मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. फडणवीस हे राज्यातील प्रभावशाली नेते आहेत. त्यांचे स्वतःचे प्रामाणिक मत होत की शिंदे मंत्रिमंडळात मी जाणार नाही, पण त्यांना मर्जीनुसार नाही तर त्यांना मर्जी विरुद्ध सामील व्हावे लागले. पाहिले 100 दिवस या प्रभावशाली नेत्या चे ही वाया गेले.यात ना भाजपला फायदा ना राज्याला फायदा. मुख्यमंत्री व मंत्री मंत्रालयात फिरत नाहीत. शंबर दिवस तर आमदार सांभाळ करण्यात गेले.दारोदारी गणपती पाहत फिरत बसणार मुख्यमंत्री शिंदे यांच्या रूपाने राज्याला पाहायला मिळाला. तर पितृ पक्षात मंत्रालयात न जाणारे मंत्री ही पुरोगामी महाराष्ट्राने प्रथमच पहिले. नवरात्रीत गरभा चे भांडवल करून आम्ही खरेच हिंदुत्वाचे कवित्व करतो हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. अर्थात राज्यात कारभार करताना सर्व सामान्य जनता, शेतकरी यांना वाऱ्यावर सोडले अन् हिंदू हिंदू म्हणून गळा काढून ओरडत बसलेले शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्राने पाहिले आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर दसरा मेळावा कसा होणार? कुणाचा भारी होणार?गर्दी अन् दर्दी कुठ असणार? असे अनेक प्रश्न होते. यात उद्धव ठाकरे यांनी मोठी बाजी मारली आहे. बाजी का मारली व कशी मारली याचे विश्लेषण थोडक्यात करू या. मुळात उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पद सोडले तेव्हा राज्यात त्यांना मोठी सहानभूतीची लाट निर्माण झाली होती,तर शिंदे यांचा द्वेष , ती सहानभुती अद्याप ही उद्धव ठाकरे यांनी टिकवली आहे. आदित्य ठाकरे यांचे राज्यात झालेले विक्रमी मेळावे, महा विकास आघाडी म्हणून तिन्ही, चारी पक्ष यांचा वाढलेला एकोपा, संभाजी ब्रिगेडचे शिवसेना सोबत जुळवणी, दलीत आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ते यांचा शिवसेनेला वाढता पाठिंबा, महिलांनी उद्धव ठाकरे यांची केलेली मोठी पाठराखण , अन् सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे शिवसैनिक हा मातोश्री बरोबरच राहिला. संजय राऊत यांची अटक, केंद्रीय तपास यंत्रणा यांचा गैर वापर , वाढती महागाई , बेरोजगारी आदी बाबत जनता उद्धव ठाकरे यांच्या बरोबर दिसली तर शिंदे यांना भाजप कडूंन न होणारी पाठराखण , गद्दार हा लागलेला डाग, मतदारांची किंमत न करता पन्नास खोके एकदम ओके हा बसलेला ठपका, भाषण कला , संपर्क यांचा अभाव, शिवतीर्थ मिळू नये म्हणून केलेलं कृत्य, तानाजी सावंत, अब्दुल सत्तार , भुमरे यांच्या सारखे वाचाळ मंत्री , कुणी उठावे अन् काय पण घोषणा करावी ,अर्थात मंत्री मंडळावर नसलेले नियंत्रण, कालच्या मेळाव्यात कार्यकर्ते पेक्षा मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले पैसे देऊन आणलेले व्हिडिओ ,तसेच पर प्रांतीय मजदुर यांचे व्हिडिओ ,सत्ता असली म्हणून आम्ही कसे ही वागू शकतो ही मस्ती , लिहून आणलेले भाषण , भाषणात काहीच नसलेले मुद्दे आदी बाबी विचारात घेतल्या तर शिंदे हे “फेल” झाले इतकं नक्की.

बी के सी वर मुख्यमंत्री भाषण करताना लोक उठून जात होते, तर उलट शिवतीर्थावर ठाकरे यांच्या भाषण दरम्यान पिन ड्रॉप शांती होती हे चित्र ही काल महाराष्ट्राने पहिले. नागपूर मधील महिलांचा व्हायरल व्हिडिओ एकीकडे तर नाशिकच्या महिलांनी शिंदे गटातील वाचाळ यांना दिलेला चोप बरेच काय सांगून जातो. नागपूर मधील बस मधील महिला मुंबई कडे पिकनिक करता चाललो आहोत असे मीडिया पुढे सांगत होत्या. पंचवीस हजार लोकांची जेवणाची सोय नवी मुंबईत होती. हजार पण जमले नाहीत असे वृत्त खाजगी टीव्ही ने दिल्याचे आपण पाहिले आहे.

उद्धव ठाकरे यांच्या भाषणात आक्रमकता दिसली ,तर शिंदे यांचे खाली मान खालून केलेलं भाषण रटाळ होते. जे लोक दूरदर्शन वर भाषण पाहत होते,त्यांनी उध्दव ठाकरे यांचे भाषण पूर्ण ऐकले तर , शिंदे यांच्या भाषण करत असताना मनोरंजन चॅनल स्विच केले हे ही सत्य समोर आले आहे.
पैसा अन् सत्ता असली म्हणजे जनाधार मिळू शकतो ,हा शिंदे यांचा भ्रम असेल पण तो पूर्ण खरा झाला नाही .मूळ अन् सच्चा शिवसैनिक हा उध्दव ठाकरे यांच्या प्रवाहात आहे हे काल सिद्ध झाले. वास्तविक न्यायलय निर्णय खूप ताणून धरले आहेत. एकदा निर्णय लागणे गरजेचे आहे. लोक दूध का दूध अन् पाणी का पाणी करण्याच्या विचारात आहेत हे तितकच खरे आहे.

राज्यात मुंबई मध्ये विधानसभेची पोट निवडणूक आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला आहे. शिंदे यांची आज तरी हिंमत होणार नाही की इथ लगेच आपली प्रतिष्ठा पणाला लावण्याची व उमेदवार उभी करण्याची .शिंदे हे भाजप ला ते न सांगता न विचारता पाठिंबा देतील. पण एक बाब स्पष्ट आहे , जे कोल्हापुरात घडल तेच इथ घडेल.या वेळी भाजप ला लक्षात येईल की शिंदे यांच्या पासून तोटाच आहे. या निवडणुकीत कानोसा घेतला असता महा विकास आघाडीचा उमेदवार विजयी होईल असेच चित्र आहे.

कालच्या शिवतीर्थ वरील गर्दीने अन् दर्दी ने हे सिद्ध केलं आहे की , मुंबई महा नगर पालिका सहज शिवसेना जिंकू शकेल. राज्यात कधी आता निवडणुका झाल्या तर शिंदे यांच्या सह भाजप चे मोठे पानीपत होईल. विरोधी पक्ष नेते अजित पवारांनी राज्य पिंजून काढले आहे. शिंदे फडणवीस मुंबईत बसून आहेत. आदित्य ठाकरे लाखोंची गर्दी मावळ मध्ये जमवतात तर बारणे अन् अन्य भाजप चे पुढारी त्याच ठिकाणी गर्दी च नाही म्हणून परत माघारी जातात. संदिपण भूमरे यांच्या समोर त्यांच्याच गावात दहा ,पंधरा लोक जमतात. तर त्याचं पैठण मध्ये आदित्य ठाकरे लाखोंची गर्दी करतात. अकोले नगर मध्ये महा विकास आघाडीने ज्येष्ठ भाजप नेते मधुकर पिचड यांचा दारुण पराभव करत अगस्ती सहकारी साखर कारखाना जिंकला. राज्यात ग्राम पंचायत निवडणुका झाल्या, राष्ट्रवादी, सेना, काँग्रेस अव्वल ठरली ,सर्वात जास्त जागा जिंकणारा , ग्रामपंचायत सरपंच म्हणून निवडून येणाऱ्या मध्ये राष्ट्रवादी अव्वल ठरली. भाजप ने शिंदे यांना जास्त दिवस मुख्यमंत्री ठेवले तर भाजप चे ही आमदार राज्यात कमी होतील. हे भाजप ला ही अंतर्गत मान्य आहे.

पण एक नक्की कालच्या शक्ती प्रदर्शन मध्ये “शिंदे शाही ” पूर्ण फेल झाली, नापास झाली, अन् शिंदे यांना पुढे भाजप सोडून अन्य पर्याय नाही हे सिद्ध झालं….
ज्ञानेश्वर गायकर पाटील
dmgaykar@gmail.com

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here