आत्मनिर्भर होण्यासाठी कौशल्य विकास कार्यक्रमाची कास धरा- प्रमोद खडसे
शरद पवार महाविद्यालयात संगणक साक्षरता व कौशल्य विकास कार्यक्रम
प्रवीण मेश्राम
गडचांदूर – जागतिकरणाच्या या युगात कौशल्य व उद्योजकता विकास कार्यक्रमाला महत्त्वाचे स्थान असून नोकरीची आशा न ठेवता स्वतःमध्ये विविध कौशल्य विकसित करून रोजगाराच्या संधी उपलब्ध करून घ्यावात असे प्रतिपादन अंबुजा फाउंडेशनच्या कौशल्य व उद्योजकता विकास संस्थेचे प्राचार्य प्रमोद खडसे यांनी केले.
शरदराव पवार महाविद्यालयाच्या गुणवत्ता हमी कक्षाच्या द्वारे आयोजित संगणक साक्षरता व कौशल्य विकास कार्यक्रमावर आयोजित कार्यशाळेत ते बोलत होते.प्रमोद खडसे पुढे म्हणाले विद्यार्थ्यांनी स्वतःला मर्यादित न करता आपले लक्ष ठरवून ती पूर्ण करण्यासाठी स्वतःला झोकून द्यावे. देशात कौशल्यावर आधारित विविध अभ्यासक्रम अस्तित्वात आहेत आपली ज्यामध्ये आवड आहे त्यामध्ये सहभागी होऊन परिपूर्ण होण्याचा प्रयत्न करून रोजगार प्राप्त करावा.
यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. संजय कुमार सिंह म्हणाले हे संगणकाचे युग आहे या युगात संगणकामुळे या क्षेत्रात अनेक रोजगाराच्या संधी प्राप्त झाल्या आहेत दूरदृष्टी ठेवून प्रशिक्षण तेच करावे की जे सध्याच्या युगात आवश्यक आहे अनेक संधी आहेत त्या प्राप्त करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपली क्षमता विकसित करावी. शिक्षण हे निरंतर प्रक्रिया आहे त्यात स्वयंरोजगारासाठी आवश्यक असणाऱ्या शिक्षणाची आपण कास धरावी असे प्रतिपादन त्यांनी केले.
यावेळी या कार्यशाळेचे आयोजक तथा गुणवत्ता हमी पक्षाचे समन्वय डॉ.संजय गोरे यांनी महाराष्ट्र शासन व केंद्र सरकारच्या वतीने विकास कौशल्य विकास कार्यक्रमाच्या अंमलबजावणीची माहिती दिली व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यावा हे सांगून आयोजनाची भूमिका विशद केली. यावेळी पदवीच्या तिन्ही वर्षातील पॉलिटिकल सायन्स क्लबच्या वतीने पाहुण्यांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी डॉ. शरद बेलोरकर यांनी केले तर आभार प्रदर्शन ग्रंथालय प्रमुख श्री.मंगेश करंबे यांनी मानले यावेळी महाविद्यालयाचे सर्व प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी तथा विद्यार्थी या कार्यशाळेला प्रामुख्याने उपस्थित होते.