अन् त्या गावात मुखाग्नी देण्यासाठी मिळेना जागा
स्मशान भूमीची जागा कागदो पत्रीच
जागेवर शेतकऱ्याचे अतिक्रमण…
आवाळपूर/सतीश जमदाडे
गाव म्हटल की तिथे मयत व्यक्ती चा अंत्यविधी करिता स्मशान भूमी किंवा एक वेगळी जागा राखीव ठेवल्या जाते. परंतू नवेगाव मध्ये काही विपरित दिसून येत असून गावातील मरण पावलेल्या व्यक्तीचा चितेला सुध्दा जागा मिळत नसल्याने गावातील नागरिकाचा प्रशासना विरोधात रोष व्यक्त केल्या जात आहे. एकीकडे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव धूमधडाक्यात साजरा केला जात असताना मात्र दुसरी कडे अशी विदारक परिस्थिती बघायला मिळत आहे.
नवेगाव हे गाव कोरपना तालुका आणि राजुरा तालुका यांचा मधात वसले आहे. गाव हे कोरपना तालुक्यात येत असले तरी ग्राम पंचायत मात्र राजुरा तालुक्यातील वरोडा ही आहे. गटग्राम पंचायत असलेल्या या गावात विवीध समस्या ने ग्रासले आहे त्यात प्रमुख समस्या म्हणजे गावातील मयत झालेल्या व्यक्तीला अग्नी देण्या करिता जागा मिळत नाही. गावातील नागरिकांनी वेळोवेळी प्रशसणाची दारे ठोठावली परंतू हाती मात्र काहीच लागले आहे.
गावातील काही वर्षा पूर्वी स्मशान भूमी करिता कोरपना तहसिलदार याचा कडे नागरिकानी दाद मागितली असता त्यांनी सर्वे क्र ५०१ मधील ४० आर जागा देवून तसा सातबारा सुध्दा काढला परंतू ती जागा आजही कागदोपत्रीच असल्याने मय्यत व्यक्तिला अग्नी देण्याकरिता गावातील नागरिकांची फरफट होते आहे.
सर्वे क्र.५०१ हा गायरान सरकार असा असला तरी मागील अनेक वर्षा पासून येथे शेतकऱ्याचे अतिक्रमण असून तिथे पिके सुध्दा घेतली जात आहे. त्यामूळे गावातील नागरिकांना अत्यविधी करिता कोणाचा शेतात तर कधी गावा बाहेर अशा ठिकाणी अंत्यविधी करावी लागत आहे.
विशेष म्हणजे नुकताच गावातील दुबे नामक व्यक्तीची मयत झाली परंतू जागे अभावी गावा बाहेर असलेल्या नाल्या लगत सदर व्यक्तीला मुखाग्नी देण्याकरिता नेण्यात आले. परंतू त्या ठिकाणचा शेतकऱ्यांनी सुध्दा मुखाग्नी देण्यास विरोध केला त्यामुळे दोन गटात तेढ निर्माण होवून वादावाद झाला. दोन गटातील वातावरण चांगलेच तापल्याने शेवटी तलाठी व तहसिलदार यांचा मध्यस्थीने तेढ सोडवून मयत व्यक्तीला मुखाग्नी देन्यात आली. परंतू ही परिस्थती अशीच चालू राहणार तर मग मयत व्यक्तीला मुखाग्नी द्यायची तरी कुठे हा प्रश्न मात्र अनुत्तरीत आहे.
“जागा अतिक्रमित असल्याने गावकऱ्यांनी तसा प्रस्ताव सादर करावा. त्यामुळे अतिक्रमित जागा काढण्यास सुकर होईल.” – मंडळ अधिकारी, नारायण चव्हाण
“नवेगाव येथील स्मशान भूमी ची जागा शासनाने तातडीने काढून द्यावी. पुन्हा असाच प्रकार घडला तर मयत व्यक्तिला घेऊन तीव्र आंदोलन करू याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची असेल.” – आकाश मनोहर पाझारे, नागरीक नवेगाव