अकोल्यात पिचड पिता पुत्र का हरत आहेत ? विरोधक का जिंकत आहेत…

0
1048

अकोल्यात पिचड पिता पुत्र का हरत आहेत ? विरोधक का जिंकत आहेत…

विशेष लेख

 

ज्ञानेश्वर गायकर पाटील
अहमदनगर
संगमनेर 
दोन दिवसांपूर्वी अकोले तालुक्यातील अगस्ती सहकारी साखर कारखाना निवडणूक झाली. वास्तविक ही निवडणूक एक दीड महिना पूर्वीच होणार होती. पण शिंदे सरकारने अती वृष्टी या “गोंडस” कारण मुळे उद्या मतदान अन् आज निवडणूक अचानक पुढे ढकलली मतदारांनी पाहिली.

अकोले तालुका हा प्रामुख्याने निसर्गाचा मुक्त वरदहस्त लाभलेला तालुका. या तालुक्यात आदिवासी समाज, मराठा समाज मोठ्या संख्येने आहे. माळी, अनुसूचित जाती, कांदडी, धनगर, वंजारी समाज ही मोठ्या प्रमाणात आहे.मुस्लिम समाज फारच अल्प असून, जैन ,गुजराथी समाज ही काही प्रमाणात आहे. आदिवासी समाज प्रमुख हिंदू महादेव कोळी, ठाकर, कातकरी समाज आहे. या तालुक्याचे प्रमुख वैशिष्ठ हेच आहे की हा तालुका पुरोगामी विचाराचा तालुका आहे. या तालुक्यात जातीवादी, धार्मिक अशी कोणतीही झुल नाही.
नैसर्गिक दृष्ट्या संपन्न तालुका आहे. प्रवरा, मुळा, अढळा या प्रमुख नद्या आहेत. महाराष्ट्रातील सर्वात जास्त पाऊस याचं तालुक्यात होतो. राज्यातील उंच शिखर कळसुबाई , हरीचंद्र गड ,विश्राम गड, अनेक मोठाली धरणे आदी बाबत हा तालुका नगर जिल्ह्यात अग्रेसर तालुका आहे. अश्या तालुक्यात राज्यातील आदिवासी समाजाचे नेते मधुकर पिचड यांचे चाळीस वर्ष राज्य होते. २०१९ मध्ये फडणवीस आणि मंडळी यांनी विरोधकांची पोर पळवणारी टोळी निर्माण केली, अन् तत्कालीन आमदार वैभवराव पिचड अलगद या टोळीच्या ताब्यात गेले. वास्तविक मधुकर पिचड यांना हा निर्णय मान्य नव्हता. त्यांनी या वर खूप बारीक विचार केला. पण भाजप कडून वेगळा धाक निर्माण करून ,पिचड यांना नको असलेला निर्णय घ्यावा लागला . अन् इथच अकोल्यातील जनतेने निर्णय घेतला तुम्ही जा, आम्ही शरद पवार यांच्या बरोबर. अकोल्यात राष्ट्रवादी शिल्लकच नाही राहिली. या काळात दोन चार तरुण पुढे आले, अन् पवार साहेब, अजित दादा यांना भेटले. भानुदास तिकांडे अध्यक्ष झाले. अमित भांगरे, अशोक भांगरे राष्ट्रवादी मध्ये आले.डॉक्टर किरण लहामटे सारखा एक उमदा पैलवान राष्ट्रवादीने गळाला लावला . जनतेची खूप सहानभुती राष्ट्रवादी घेऊन बसली . एकास एक लढत झाली .अन् प्रचंड मोड्या पराभवास वैभव पिचड यांना सामोरे जावे लागले.

दरम्यान अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी तालुक्यात मोठल्या सभा घेतल्या. प्रचंड गर्दीच्या ह्या सभा तेव्हा चर्चेचा विषय झाला. शरद पवार यांनी अकोल्याच्या विकासात योगदान नक्कीच खूप मोठे आहे, निळवंडे धरण निर्मितीचे शरद पवार जनक आहेत . शरद पवार धरण असे ही लोक या धरणाला म्हणतात. पाट पाणी प्रश्न, भंडारदरा धरण फेर पाणी वाटप ही पवार साहेब यांची देणगी, तर मुळा बारमाही अजित दादांची देणगी. गणोरे पर्यंत अढळा बारमाही झाली , होत आहे ती ही राष्ट्रवादी देणगी आहे. या सर्व कारणांमुळे अकोले तालुका हा जाती पाती च्या राजकारणा पासून लांब गेला, अन् प्रगती व पुरोगामी विचार घेऊन तो कायम अग्रेसर राहिला. रामदास आठवले हे शिर्डी मतदार संघात उभे होते , अकोले वगळता सर्व मतदार संघात ते पिछाडीवर राहिले.मात्र अकोल्यात त्यांना ३३ हजाराचे लीड मिळाले. मोदी लाटेत ही अकोल्याने काँग्रेसचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची पाठराखण केली, तर २०१९ मध्ये ही अकोलेकर काँग्रेस उमेदवार भाऊसाहेब कांबळे यांच्या पाठीमागे उभे राहिले. पिचड यांनी हा विचार भाजप मध्ये जाताना जरूर केला, पण ही मते केवळ पिचड म्हणून मिळत होती हा गैरसमज त्यांचा झाला ,अन् नेमकी इथेच गल्लत झाली.

विधानसभेच्या दारुण पराभवानंतर काही दिवसात पिचड यांचे अनेक सहकारी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस कडे झुकू लागले यात प्रामुख्याने शरद पवार साहेब यांचे खंदे समर्थक लोकनेते सीताराम गायकर यांचा समावेश होता. गायकर साहेब यांना मानणारी हजारो कार्यकर्ते पुन्हा राष्ट्रवादी मध्ये सामील झाले. राष्ट्रवादीची ताकद वाढली. काही दिवसातच कैलास राव वाकचौरे हे पुन्हा राष्ट्रवादी सामील झाले, अन् हा पिचड यांना फार मोठा धक्का बसला. जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर पंचायत या भाजप च्या विजयाचे खरे शिल्पकार कैलास वाकचौरे होते. आज ही भाजपची नगरपालिकेत असलेली सत्ता ते काही क्षणात घालू शकतात , इतका त्यांचा दबदबा आहे. मात्र सभापती निवडी मध्ये कैलास वाकचौरे यांना विश्वासात न घेता वैभव पिचड यांनी जनमानसात कवडीची ही किमत नसलेल्या पुढाऱ्यांचे ऐकले अन् पिचड पुन्हा फसले. अगस्ती सहकारी साखर कारखाना मध्ये कैलास वाकचौरे यांचा मोठा विजय झाला , अकोले गटातून त्यांनी दिलेली मते म्हणजे धो धो पाऊस होता. एक कुशल नेतृत्व पुन्हा गायकर साहेब यांच्या साथीला आले.

पिचड यांच्या अवती भवती असणारी मंडळी कायमच चुकीचे सल्ले देत गेली. दशरथ सावंत व बी.जे देशमुख यांनी गायकर यांना टार्गेट करून अनेक आरोप केले. हे सर्व आरोप बिनबुडाचे होते व पिचड या पाठीमागे होते असा समज जनतेचा होता. या संमजीला पुष्टी ही मिळाली की दशरथ सावंत व बी जे देशमुख हे ऐन निवडणुकीत पिचड यांना मिळाले. सीताराम गायकर यांच्यावर इतके आरोप करून ही संयमी , शांत नेतृत्व गायकर शांतच राहिले. या मुळे त्यांना जनतेतून मोठी सहानभुती कायम वाढतच राहिली. पिचड साहेब यांनी दशरथ सावंत यांना दूर ठेवले असते तर अजून काही मते पिचड पॅनल ची वाढली असती.

निवडणूक म्हटली की नियोजन आले. डाव सफल करणे आले.कार्यकर्ते सांभाळणे आले. ही कसब गायकर यांच्या कडे मोठी आहे.कैलास वाकचौरे यातील मोठे दर्दी आहेत. आमदार किरण लहामटे , अशोक भांगरे, मधुकर नवले, शांताराम वाळुंज यांची अफाट शक्ती आज तालुक्यात आहे. त्यांच्या जोडीला शेतकरी नेते अजित नवले होते. आज कारखाना चालवताना ही सर्व मंडळी बाहेर असली तरी ते मार्गदर्शक राहणार आहेत. विचारांची मोळी कारखाना चालवताना दिसणार आहे. पिचड यांनी अकोले शिक्षण संस्थेत जो गोंधळ घातला त्या बद्दल जनतेने त्यांना मोठी शिक्षा दिली आहे. चर्चा करताना एक, बाहेर एक , वाणी अन् करणी या मध्ये फरक केल्याने जनता मोठी नाराज होती. वास्तविक त्यांनी आता याचा विचार करून आपली प्रतिमा सुधारली पाहिजे . मधुकर पिचड यांच्या बद्दल जनतेत अजून मोठी सहनभुती आहे. त्याचा ही फायदा त्यांनी करून घेतला पाहिजे. अकोले शिक्षण संस्था मध्ये सर्व घटकांना सामावून घेतले पाहिजे. पिचड साहेब यांनी या बाबत योग्य निर्णय घेतला नाही तर , आमदारकी गेली, ग्रामपंचायती मध्ये अनेक पराभव पत्करावा लागला , पुढे कारखान्यात नेस्ताबुत झाले. तसे आगामी काळात दूध संघ ही जाईल. मार्केट समिती ही जाईल. जर संस्थाच हातात नसतील तर पुढे काय करायचे हा मोठा प्रश्न असेल. कदाचित भाजप हि मेरिट चा वेगळा उमेदवार शोधू लागला तर नवल वाटत नाही राहणार. या करिता त्यांनी तालुक्यात जनमत काय आहे ते तपासणे गरजेचे आहे. बगल बच्चे कायमच स्वार्थी असतात. त्यांचा सल्ला न मानता त्यांनी जनमानसातील मत विचारात घेऊन सावध पाऊले टाकली पाहिजे. गायकर साहेब यांचे धोतर उडवणाऱ्या ना काल जनतेने उत्तर दिले. इतका मोठा विजय आमदार किरण लहमाटे , मधुकर नवले, अशोक भांगरे, अजित नवले ,विजय वाकचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली गायकर साहेबांनी मिळवला अन् कुठला ही उत्मात न होता पचवला ही.

कारखान्याचे धुराडे लवकरच पेटेल. कारखाना आर्थिक स्थिती बेताची असल्याने नवीन संचालक मंडळ नक्कीच ह्या भाग्य लक्ष्मीला पुन्हा वैभव प्राप्त करून देतील. जनतेने तोच विश्वास टाकला आहे म्हणूनच २२/० अशी झेप त्यांनी घेतली आहे.शरद पवार साहेब यांचे अनमोल विचार अन् अजित दादा पवार यांचे मार्गदर्शन राहणार आहे. महा विकास आघाडी म्हणून तुम्ही राज्यात लढला तर शिंदे फडणवीस उध्वस्त होतील, हा मोलाचं मंत्र अकोल्याचे आमदार किरण लहामटे यांनी संपूर्ण महाराष्ट्राला दिला आहे. महाराष्ट्र नक्कीच याची दखल घेईल. गायकर पाटील यांचे संयमी नेतृत्व फार मोठं यश देऊन गेले.पिचड साहेब शिक्षण संस्थेत नक्कीच चूक सुधारून जनते मध्ये विश्वास निर्माण करतील .कोणाचे किती ऐकायचे याचा ही विचार करतील. न्यायालयीन लढाई होयला नको होती. सत्यमेव जयते हे ब्रीद आहे.ते सार्थक झाले.सध्या अनेक पतसंस्था यांच्या खुन्नस म्हणून चौकशी चालू केल्या आहेत. त्या त्यांनी थांबवल्या पाहिजे. खुनसी राजकारण अकोल्याच्या पिंड नाही ,हे जनतेने दाखवले आहे. हे सर्व विसरून पुन्हा नव्या प्रवाहात पिचड घराणे येईल तेव्हा ते पुन्हा अकोल्यावर नक्कीच राज्य करतील. राज्यात आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी शिवसेना सरकार स्थापन नक्कीच होईल.केंद्रात मोदी राहतील की जातील हे सांगणे अवघड आहे. सत्ता येतात जातात.लोकशाही आहे. खुन्नसशाही चांगली विचारसरणी नाही. अगस्ती ऋषींचा व त्याच भूमित मधील हा कारखाना पाच वर्षात नक्कीच कर्ज मुक्त होईल अशी अपेक्षा करू या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here