घुग्गूस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

0
386

घुग्गूस शहरातील निर्माणाधीन रेल्वे उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करा – मंत्री सुधीर मुनगंटीवार

 

 

चंद्रपूर, दि. 21 ऑगस्ट : घुग्गूस हे औद्योगिक शहर असून या शहराची लोकसंख्या वेगाने वाढत आहे. घुग्गूस शहरातील रेल्वे गेटवर उड्डाणपुलाचे बांधकाम सुरू आहे. रेल्वे क्रॉसिंगमुळे होणारी वाहतूक कोंडी व ओव्हरलोडिंग वाहतुकीमुळे अपघाताचे प्रमाण देखील वाढत आहे. त्यामुळे वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था असणे गरजेचे असून येथील निर्माणाधीन उड्डाणपुलाचे बांधकाम प्राधान्याने पूर्ण करावे, असे निर्देश राज्याचे वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.

घुग्गूस येथील निर्माणाधीन उड्डाणपूल, घुग्गूस वळण मार्ग व रेल्वे क्रॉसिंगवरील वाहतूक समस्याबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळेअतिरिक्त जिल्हाधिकारी विद्युत वरखेडकर, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, सहाय्यक जिल्हाधिकारी रोहन घुगे, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, विवेक बोढे ,तहसीलदार निलेश गौंड, घुग्गूसचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर आदी उपस्थित होते.

चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गूस हे औद्योगिक शहर असल्याने येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी पर्यायी उपाययोजना करणे गरजेचे आहे, असे सांगून मंत्री सुधीर मुनगंटीवार म्हणाले, जड वाहतुकीसाठी 2200 मीटर लांबीच्या नवीन बायपास रोडची निर्मिती करण्यात येत आहे. वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी उड्डाणपुलाची निर्मिती हा कायमस्वरूपी उपाय आहे. लॉयड मेटल्स, एसीसी सिमेंट आदी कंपन्याच्या जड वाहतूकीकरीता पर्यायी रस्त्याची निवड करावी. जड वाहतुकीसाठी बायपास रोड तयार करावेत. तसेच रेल्वे गेट आणि रस्त्याचे रुंदीकरण करावे. वे-ब्रिज रेल्वे गेटवरून दुसरीकडे स्थलांतरित करावे. जेव्हा ओव्हरलोडींग होते अथवा डबल इंजिन लावल्या जाते तेंव्हा या कामांमध्ये खूप वेळ लागतो, त्यामुळे रेल्वे गेट खूप वेळ बंद असते. यावर तातडीने उपाययोजना कराव्यात.

श्री. मुनगंटीवार पुढे म्हणाले, रस्त्याची डागडुजी, व रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम कंत्राटदाराकडून तातडीने करून घ्यावे. चंद्रपूर बायपास रोडची भूसंपादन प्रक्रिया शेतीमुळे प्रलंबित आहे, ती प्रक्रिया त्वरित पूर्ण करावी. सर्वे करतांना त्याचे फायदे नागरिकांना समजावून सांगावे. जोपर्यंत फ्लाय ओव्हर ब्रिज तयार होत नाही, तोपर्यंत तात्पुरत्या रेल्वे गेटची उभारणी करावी. तसेच त्या ठिकाणी चार सुरक्षारक्षक तैनात करावे. रस्त्यावर बोर्ड लावून बॅरियर लावावेत, जेणेकरून चुकीच्या मार्गाने वाहने जाणार नाही. त्या ठिकाणी ट्रॅाफिक पोलिसाची नियुक्ती करावी. तसेच कोणतेही काम करतांना त्याचे आकलन करून काम विहित वेळेत पूर्ण होईल, याकडे गंभीरतेने लक्ष द्यावे, अशा सूचना देखील त्यांनी उपस्थितांना दिल्या.

घुगुस येथे 2200 मीटर लांबीचे नवीन बायपास निर्मितीकरीता 6.6 एकर शेत जमिनीचे अधिग्रहण होणार आहे. तसेच नवीन बायपास निर्मितीची कार्यवाही त्वरीत पूर्ण करण्यात येईल. रेल्वे क्रॉसिंगमुळे वाहतूक कोंडी निर्माण होते. त्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात मानव संचालित गेट उभारून दुचाकी व लहान चारचाकी वाहनासाठी गेट उभारण्याचे नियोजित आहे. यासंदर्भात डीआरएम सोबत बैठक घेण्यात येणार असल्याचेही सांगितले. एसीसी व लॉयड मेटल कंपन्यामार्फत होणारी जड वाहतूक बस स्टॅन्ड चौक ते पोलीस स्टेशन मधून नकोडा उसेगाव मार्गास जोडणाऱ्या रस्त्यावरून वळविण्यात येणार आहे. असल्याचेही मंत्री श्री. मुनगंटीवार म्हणाले.

बैठकीला घुग्गुसचे पोलीस निरीक्षक बबन फुसाटे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता प्रकाश अमरशेट्टीवार, कार्यकारी अभियंता सुनील कुंभे, मध्य रेल्वेचे वरिष्ठ शाखा अभियंता निखिल आकूलवार, विवेक बोढे, लॉयड मेटल्स, एसीसी कंपन्यांचे प्रतिनिधी प्रामुख्याने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here