केंद्र सरकारने लागू केलेली ‘अग्निपथ’ योजना रद्द करावी…!
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ची जिल्हाधिकारी यांच्याकडे मागणी
चंद्रपूर, 27 जून : केंद्र सरकारने कंत्राटी पद्धतीने भारतीय सैन्य दलात भरतीकरिता अग्निपथ योजना आणली असून याद्वारे केवळ 4 वर्षाकरिता तरुणांची भरती होणार आहे. यानंतर तरुण बेरोजगार होणार आहेत. सैन्य दलातून निवृत्ती नंतर या तरुणांना कोणतीही पेन्शन मिळणार नाही. यामुळे तरुणांचे आयुष्य अंधकारमय होईल. सदर योजनेमुळे सैन्य दलात भरती होण्यासाठी तयारी करणाऱ्या युवकांत नैराश्य पसरले आहे. याकरिता सदर योजनेला देशभरातून विरोध होत आहे.
देशातील समस्त तरुणांची भावना लक्षात घेत तरुणांच्या भविष्याशी खेळणारी योजना रद्द करण्याबाबत केंद्र सरकारला अवगत करण्यात यावे, असे निवेदन आज महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी चंद्रपूर तर्फे जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. यावेळी उमाकांत धांडे, राहुल ताजने, प्रकाश मारकवार, खुशाल लोडे, नरेंद्र बोबडे, महेंद्र कुनघाडकर, यशवंत नक्कावार, अनिल बद्दलवार, मिनाक्षी गुजरकर, कविता वैरागडे, सुलभा जक्कुलवार आदी उपस्थित होते.