पोंभुर्णा तालुक्यात वाघाची दहशत कायम वाघाच्या हल्यात महिला ठार

0
562

वाघाच्या हल्ल्यात महिला ठार,

पोंभुर्णा प्रतिनिधी:-  रुपेश मंकिवार

पोंभुर्णा तालुक्यात मागील अनेक दिवसांपासून वाघाने धुमाकूळ घातला आहे. कसरगट्टा येथील कापुस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना ताजी असतानाच आज सकाळी फिरायला गेलेल्या एका महिलेवर दबा धरून बसलेल्या वाघाने हल्ला चढवून ठार केल्याची घटना आज दिनांक १६ डिसेंबर ला सकाळी ६ वाजता च्या सुमारास पोंभुर्णा वेळवा मार्गावर घडली.

संध्या विलास बावणे वय ३५, रा. वेळवा असे मृत महिलेचे नाव असुन ति वेळवा येथील रहिवासी आहे.पोंभुर्णा वेळवा मार्गावर वाघाचा वावर मागील महिनाभरापासून सुरू आहे.या परिसरातील अनेक नागरीकांना रस्त्यावर वाघाचे दर्शन झाले आहे.पण आज

वेळवा येथील महिला पोंभूर्णा रोडकडे सकाळी फिरायला आली असता डॉ.पारसमणी उराडे यांच्या शेताजवळ वाघाने हल्ला चढवून ठार केले. महिलेवर हल्ला झाला त्याच वेळी फिरायला आलेल्या मुलांनी आरडाओरड केला मात्र तोपर्यंत वाघाने सदर महिलेला ठार केले होते. याची माहिती होताच वेळवा व परीसरातील गावातील नागरीकांनी घटनास्थळी धाव घेतली,पोंभुर्णा पोलिस व वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. नरभक्षक वाघाचा बंदोबस्त करण्यात येणार नाही तोपर्यंत मृतदेह उचलु देणार नाही अशी भुमिका कुटुंबिय व गावकऱ्यांनी घेतल्यामुळे बराच काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. तब्बल ८ तास मृतदेह तसाच होता. वनविभागाने नागरिकाचा रोष लक्षात घेता वनविभागाकडून मृतकाचे कुटुंबांना तत्काळ मदत म्हणून ५ लक्ष रुपये व मृतकाच्या कुटुंबातील एका व्यक्तीला कायमस्वरुपी नौकरी देण्याचे आश्वासन लेखी लिहून देण्यात आले. नंतर मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी पाठवण्यात आले. यावेळी वनविभाग व पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

मृतक महिलेला २ मुले असून मुलगा ८ वीत तर मुलगी १२ वीचे शिक्षण घेत आहेत.

घटनेचा पुढील तपास वनविभाग करीत आहे.

 

*वाघाचे आणखी किती बळी*

याच वर्षी मार्चमध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चेक आष्टा येथील शेतकऱ्यांला वाघाने ठार केले त्यानंतर कसरगट्टा येथील कापुस वेचण्यासाठी गेलेल्या महिलेला वाघाने ठार केल्याची घटना घडली तर दुचाकी ने जाणार्या युवकाला रस्त्यावरून फरफडत जंगलात नेले व गंभीर जखमी केले.अशा अनेक घटना घडत असतात मात्र वनविभागाने याकडे दुर्लक्ष केले असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.वाघाला पाळत ठेवण्यासाठी कसरगट्टा येथे शेतशिवारात ११ कॅमेरे बसविण्यात आले व कर्मचाऱ्यांच्या सह गस्त ठेवण्यात आली पण् आता वाघाने आपल वास्तव वेळवा पोंभुर्णा मार्गावर हलवल्याचे या घटनेवरून दिसून येत आहे.

 

*शेतमजूर घराकडे परतले*

वेळवा,आष्टा,पोंभुर्णा मार्गावर अनेक शेतकऱ्यांनी शेती केलेली आहे.शेतात शेतमाल असुन कापुस, मिरची तोडण्याचा हंगाम सुरू आहे.आज घडलेल्या दुर्दैवी घटनेमुळे शेतमजूरामध्ये भितिचे वातावरण पसरले व ते आल्या पावले परतले यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे ठाकले असुन मोठ्या नुकसानीला सामोर जावे लागत आहे.यामुळे या वाघाचा बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी परीसरातील शेतकऱ्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here