विरुर स्टेशन येथे चोर बिटी बियाण्याची विक्री, कृषी विभाग कुंभकर्णी झोपेत
राजुरा, अमोल राऊत : शेती हंगाम सुरू झाल्याची संधी साधून चोर बिटी बियाणे विक्रीला तालुक्यात चांगलाच ऊत आला आहे. मात्र याकडे कृषी विभागाची बघ्याची भूमिका कुंभकर्णी झोपेत असल्याची कबुली देत आहे. तालुक्यासह विरुर स्टेशन येथे या अस्सल विक्रेत्यांना सुगीचे दिवस आल्याची चर्चा संपूर्ण तालुक्यात मोठ्या प्रमाणात सुरु आहे.
तेलंगणातून कमी किमतीत चोर बिटी बियाणे आणून चढ्या किमतीत विकण्याचा धंदा सराईतपणे सुरु असून यावर कारवाई होताना दिसून येत नाही. बोगस बियाणे शेतकऱ्यांच्या माथी मारून आर्थिक लूट होत असताना कृषी विभागाची कुंभकर्णी झोप शेतकऱ्याला खाईत झोकण्याची पावतीच आहे.
तालुक्यातील विरुर स्टेशन येथे कृषी विभाग उदासीन असल्याने पोलीस प्रशासनाशी आर्थिक मधुर संबंध प्रस्थापित करून चोर बिटी बोगस बियाणे विक्रीचा धंदा बेधडकपणे सूरू असल्याची खात्रीलायक माहिती आहे. शेती पेरणी हंगाम सुरू होण्याची चाहूल लागताच शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती हेरून बियाणे विक्रेत्याकडून फसवणूक करण्यात येत आहे. बोगस बियाणे माथी मारून आर्थिक पिळवणूक केल्या जात आहे. चढ्या किमतीत बोगस बियाण्याची विक्री करत चोर बिटी विक्रेते आपले खिसे भरून घेत आहे. सराईतपणे सुरु असलेल्या या धंद्याकडे कृषी विभागाचे लक्ष न जाणे हि संशयात्मक बाब आहे. अशा विक्रेत्यांना आश्रय देत अभय देणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांसह त्या विक्रेत्यांवर कारवाई होईल का याकडे परिसरातील सर्व जनतेचे लक्ष लागले आहे.