वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील बेजबाबदारपणा मुळेच सर्पदंश झालेल्या रुग्णाचा मृत्यू – हंसराज अहीर
प्राथमिक केंद्रे, ग्रामिण रुग्णालयात सर्पदंशावरील लसींची उपलब्धता करण्याची सुचना
चंद्रपूर :- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डाॅक्टरांच्या बेजबाबदारपणा व हलगर्जीमुळे विरुर गाडेगांव(ता कोरपना) येथील 27 वर्षीय पवन मेश्राम या इसमाचा सर्पदंशाने मृत्यु झाला ही अत्यंत वेदनादायी घटना असून वैद्यकीय महाविद्यालय असतांना अशाप्रकारे दुर्देवी मृत्युला सामोरे जावे लागत असेल तर ही बाब गंभीर असून वैद्यकीय महाविद्यालयाच्या वरीष्ठांनी यांची गंभीरपणे दखल घेवून भविष्यात असा दुर्देवी प्रकार घडणार नाही याची दक्षता घ्यावी असे पूर्व केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर यांनी सुचित केले आहे.
मण्यार जातीच्या विषारी सापाच्या चाव्याने पवन मेंश्राम या इसमाचा मृत्यु झाल्याची माहिती कळताच हंसराज अहीर यांनी रुग्णलयात भेट देवून घटनाक्रम जाणून घेतला व नातेवाईकांचे सांत्वन केले. रुग्ण पहाटे 5 वा आल्यानंतर त्याला तात्काळ आयसियु मध्ये दाखल करणे गरजेचे असतांना डाॅक्टरांनी यात कसूर केली आहे. वेळीच उपचार मिळाले असते तर हा रुग्ण बचावला असता. नागरीक आस घेवून या जिल्हा रुग्णालयाकडे आपल्या पेशंटला घेवून येतात. परंतु डाॅक्टरांच्या निष्काळजीपणामुळे अशाप्रकारे मृतदेह न्यायची वेळ येत असेल तर ही बाब अत्यंत गंभीर असल्याचेही हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
ग्रामिण भागात सर्पदंशाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत असतांना प्राथमिक आरोग्य केंद्र , उपजिल्हा रुग्णालय तसेच ग्रामिण रुग्णालयात सर्पदंशावरील लसींची उपलब्धतता केल्यास रुग्णांना निश्चितपणे जिवदान मिळू शकतो परंतु याकडे जिल्हा आरोग्य विभागाचे दुर्लक्ष असल्योने रुग्णाला जिल्हा रुग्णालयात आणण्यात वेळ जातो व रुग्ण दगावतो हा प्रकार सुध्दा चिड आणणारा असल्याचे अहीर यांनी म्हटले आहे. त्यामुळे अधिष्ठाता, जिल्हा शल्य चिकित्सक व आरोग्य अधिकाऱ्यांनी बाबतीत लक्ष घालून अद्ययावत सुविधा उपलब्ध करण्यावर भर द्यावा अशी सुचना अधिकाऱ्यांना केली. जिल्हा रुग्णालयातील अव्यस्थेबद्दल संताप व्यक्त केला. मृतकाच्या 5 वर्षीय मुलीला सुध्दा सर्पदंश झाला असतांना वैद्यकिय अधिकाऱ्यांनी वेळकाढू धोरण स्वीकारले ही बाब सुध्दा गंभीर आहे. सदर मुलीवर प्रभावी उपचार करण्याची सुचना या भेटीप्रसंगी अहीर यांनी केली.