अजबच… तामसी रेती घाटावरील कॅमेरे गेले चोरीला

0
6

अजबच… तामसी रेती घाटावरील कॅमेरे गेले चोरीला

गैरव्यवहार लपवण्यासाठी कटकारस्थानाचा संशय

घाटावरील कॅमेरे चोरी जाण्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना

 

कोरपना :- कोरपना तालुक्यातील तामसी रेती घाटावर एक धक्कादायक व संशयास्पद घटना समोर आली आहे. घाटावरील सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेल्याची तक्रार महसूल प्रशासनाकडे करण्यात आली असून, ही घटना नेमकी रेती उपसा पूर्ण झाल्यानंतर आणि अनेक तक्रारी दाखल झाल्यानंतरच घडल्यामुळे, नागरिकांमध्ये तीव्र संताप आणि गंभीर संशय निर्माण झाला आहे.

 

मंजुरी होती ६१८४ ब्रास, पण उपसा तब्बल ४०००० ब्रास?

वर्धा नदीच्या तामसी घाटावरून ६१८४ ब्रास रेती उपसा करण्याची अधिकृत परवानगी शासनाने प्रकल्प संचालक (केंद्रीय महामार्ग) यांना दिली होती. मात्र, १४० दिवस चाललेल्या उपशामध्ये तब्बल ४०००० ब्रास रेती उचल करण्यात आली, असा गंभीर आरोप स्थानिक राजकीय नेते आणि सामाजिक कार्यकर्ते सातत्याने करत आहेत.या प्रकारामुळे प्रशासनाच्या देखरेखीतच मोठ्या प्रमाणावर रेती तस्करी झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत.

३० मे रोजी उपसा थांबला, आणि लगेचच ‘कॅमेरे चोरीला’

३० मे २०२५ रोजी घाटधारकाने उपसा थांबवून संबंधित अधिकाऱ्यांकडे मोजणी करून अहवाल सादर करण्याची विनंती केली. त्यानंतर काही दिवसातच घाटावरील सीसीटीव्ही कॅमेरे चोरीला गेले असल्याची माहिती घाटधारकाने महसूल विभागाला दिली.या ‘चोरी’ची घटना तशीच असामान्य ठरली. कारण घाटावर कायदेशीर उपसा सुरू असताना, त्या प्रक्रियेवर नजर ठेवण्यासाठी लावलेले कॅमेरेच गायब होणे, हे केवळ अपघात मानण्यासारखे नाही.

 

खोट्या तक्रारीचा कट? माहितीच्या अधिकारात फुटेज मागवले, आणि…

या प्रकरणाला आणखी गडद वळण तेव्हा मिळाले, जेव्हा काही नागरिकांनी माहिती अधिकार कायद्यान्वये घाटावरील सीसीटीव्ही फुटेज मागवले. त्यानंतरच, घाटधारकाकडून कॅमेरे चोरीचे कारण पुढे आणण्यात आले.त्यामुळे, रेती तस्करीच्या पुराव्यांचे उच्चाटन करण्यासाठी ही तक्रार मुद्दाम करण्यात आली असल्याचा संशय नागरिकांनी व्यक्त केला आहे.

 

प्रशासनाचे मौन संशयास्पद!

अनेक वेळा तक्रारी करूनही, ना उपविभागीय अधिकारी राजुरा, ना तहसीलदार कोरपना यांनी कोणतीही कारवाई केली नसल्याचे तक्रारदारांचे म्हणणे आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा होऊनही प्रशासनाचे मौन, किंवा दुर्लक्ष का होते आहे, हा मुख्य प्रश्न आहे.

 

तालुक्यात पहिल्यांदाच अशी ‘चोरी’ ; नागरिकांमध्ये संताप

तालुक्यात प्रथमच चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेच चोरी केल्याची घटना समोर येत असून, “हे चोर होते की साक्षच लपवण्यासाठी घडवलेले नाट्य?” असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत.

 

जनतेची मागणी: दोषींवर कारवाई करा, चौकशी व्हावी!

हा केवळ रेती उपसा नाही, तर संपूर्ण यंत्रणेचा गैरवापर, प्रशासनाचा सहभाग आणि लोकसंपत्तीचा गैरहिशोब आहे.
तामसी रेती घाट प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी जोरदार मागणी सामाजिक कार्यकर्ते, स्थानिक नागरिक आणि विविध संघटनांकडून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here