राजुरा येथे मोहुर्ले हल्ला प्रकरणी पोलिसांची कारवाई संशयास्पद
३०७ कलमान्वये कारवाई करा, अन्यथा रास्ता रोको आंदोलनाचा इशारा
शिवसेना (उबाठा) उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे यांची पत्रकार परिषद
राजुरा, ता.प्र. : दिनांक २५ फेब्रुवारी ला रात्री राजुरा येथील दसवारू नाल्याजवळील शिवसेना ( उबाठा ) चे शहरप्रमुख स्वप्निल मोहुर्ले यांच्या पाहुणचार या हाॅटेल मध्ये दारू पिण्यासाठी मज्जाव केला, म्हणून चार युवकांनी स्वप्निल वर चाकु ने प्राणघातक हल्ला केला. या घटनेतील आरोपींविरूध्द राजुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. मात्र राजुरा पोलिसांनी स्वप्निल मोहुर्लेला जीवे मारण्याचा प्रयत्न केला व गंभीर जखमी असतांनाही भादंवि च्या ३०७ कलमान्वये गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे दोन दिवसातच हे सर्व आरोपी सुटले असून ते काहीच झाले नाही, अशा अविर्भावात फिरत आहेत. सात दिवसापुर्वी ही घटना घडूनही राजुरा पोलिसांच्या ढिसाळ तपासामुळे अजुनही स्वप्निल मोहुर्ले चे बयान पोलिसांनी घेतले नाही. आता तातडीने चारही आरोपींवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तातडीने गुन्हा नोंदवून राजुरा येथील कायदा व सुव्यवस्था सुचारू राहण्यासाठी आरोपींना जेलमध्ये पाठवा, अन्यथा सात दिवसानंतर तहसिल कार्यालयासमोर रास्ता रोकोसह तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा शिवसेना उध्दव बाबासाहेब ठाकरे पक्षाचे नेते उप जिल्हा प्रमुख बबन उरकुडे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, तालुकाप्रमुख संदीप वैरागडे, उपजिल्हा युवासेना प्रमुख कुणाल कुडे यांचेसह अनेक नेत्यांनी पत्रकार परिषदेत दिला.
यासंदर्भात शिवसेना ( उबाठा ) नेत्यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केले. निवेदनानुसार स्वप्निल मोहुर्लेवर चार आरोपींनी चाकुने केलेल्या हल्ल्यात तो जबर जखमी होऊन खाली पडला. यानंतर सर्व आरोपी फरार झाले. यावेळी तेथे उपस्थितांनी त्याला तातडीने राजुरा उपजिल्हा रूग्णालयात दाखल केले. यानंतर प्रकृती गंभीर असल्याने त्याला चंद्रपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले. स्वप्निल च्या किडनी जवळ चाकुचा घाव असल्याने रक्तस्त्राव होऊन रक्ताच्या गाठी निर्माण झाल्या. यामुळे त्याला खाजगी दवाखान्यात हलवून शस्त्रक्रिया करण्यात आली. या प्रकरणी हल्ला करणारे आरोपी आकाश राठोड, ऋतिक लांडे, राकेश उताणे व निरज चिडे यांनी यांचेवर भादंविच्या कलम ३२४, ३२६, ५०४, ५०६ व ३४ अन्वये गुन्हा नोंदविला आणि त्यांची योग्य चौकशी न करता न्यायालयात हजर करून त्यांची पोलिस कस्टडी सुध्दा मागीतली नाही. या प्रकरणी पोलिसांची भुमिका संशयास्पद असून एवढी मोठी घटना घडल्यावर पोलिसांनी अद्याप जखमी असलेल्या स्वप्निल मोहुर्ले चे बयानही घेतले नाही. आता बाहेर आलेले आरोपी आमचे काय बिघडले म्हणून बिनधास्तपणे फिरत आहेत, असा आरोप पत्रकार परिषदेत करण्यात आला.
पोलिसांच्या या ढिसाळ कामगिरीमुळेच कायद्याचा वचक राहिला नसून राजुरा भागात गुन्हेगारी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. आता या प्रकरणी तातडीने खूनाचा प्रयत्न केल्याचे कलम जोडून कारवाई करावी, अशी मागणी उध्दव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे उपजिल्हा प्रमुख बबन उरकुडे, युवासेना जिल्हाप्रमुख विक्रांत सहारे, तालुका शिवसेना प्रमुख संदीप वैरागडे, उपजिल्हा युवासेना प्रमुख कुणाल कुडे, युवासेना तालुका प्रमुख अमित मालेकर, बंटी मालेकर, बबलू खुशवाह, प्रणित अहिरकर, नरसिंग मादर यांनी पत्रकार परिषदेत केली. या पत्रकार परिषदेला गोवरी सरपंच आशा उरकुडे, गजानन मोहुर्ले उपस्थित होते. माागणी पुर्ण न झाल्यास रास्ता रोको आंदोलनाचा इशाराही या नेत्यांनी दिला आहे.
पोलिसांचे आरोपींशी सलोख्याचे संबंध
राजुरा पोलिस ठाण्यातील पोलिस काॅन्टेबल संदीप बुरडकर यांचे या घटनेतील आरोपींशी सलोख्याचे संबंध असून तोच सर्व मॅनेज करीत आहे,असा आरोप पत्रपरिषदेत करण्यात आला. यापुर्वीही राजुरा भागातील अनेक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या आणि बेकायदेशीर काम करणा-या लोकांसोबत पोलिस कांस्टेबल संदीप बुरडकर यांचे जवळचे संबंध होते. त्यामुळे त्याची दोन वेळा बदली झाली, पण पुन्हा ते इथेच कसे काय रूजू झाले, हा संशोधनाचा विषय आहे. चंद्रपूर पोलिस अधिक्षक यांनी याची दखल घेणे गरजेचे असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.