गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने विधानसभेवर भव्य जनआकोश मोर्चा
राजुरा क्षेत्रातून हजारो आदिवासी बांधव होणार सहभागी
महिपाल मडावी यांची पत्रकार परिषदेत माहिती
राजुरा, ता.प्र. – गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या वतीने नागपूर येथे विधानसभेवर भव्य जनआकोश मोर्चा दि. 15 डिसेंबर 2023 धडकणार असून या मोर्चात राजुरा तालुक्यातील हजारो आदिवासी बांधव सहभागी होणार आहेत. या भव्य मोर्चाद्वारे आदिवासींच्या विविध ज्वलंत प्रश्नावर लक्ष वेधण्यात येणार असल्याची माहिती गोंडवाना गणतंत्र पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष महिपाल मडावी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या मोर्चाद्वारे सरकार दरबारी प्रामुख्याने आदिवासी जमातीत धनगर व इतर कोणत्याही जातींना समाविष्ट करण्यात येवु नये, आदिवासींच्या जमिनी बळकाविण्याऱ्यावर अट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, राजुरा, बामणवाडा व रामपुर येथील कोट्यावधी रूपयांच्या आदिवासींच्या जमिनी गैरआदिवासीनी अन्याय करून अवैध हस्तांतरण करून बळकावल्या मात्र हे आदिवासी अजुनही दारीद्यात जगत आहेत. याची ई.डी. च्या माध्यमातुन सखोल चौकशी करण्यात यावी, आदिवासींना वाटपात मिळालेल्या जमिनी सुद्धा बेकादेशिररित्या विकी करून आदिवासींच्या जमिनीची विल्हेवाट लावण्यात आली असुन यात महसुल अधिकाऱ्यांचा हात असल्याने दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून बडतर्फ करावे आणि जमिन आदिवासींचे नावे करण्यात यावी, शेतकऱ्यांचे शेतीचे विजबिल माफ करावे, पिकाचे हमीभावाचा केंद्रीय कायदा करावा, वन व महसुल अतिक्रमण जमिनीवर कसत असलेल्या शेतकऱ्यांना जमिनीचे पट्टे द्यावे आणि आदिवासींना वनहक्काचे पट्टे दिलेल्यांना 7/12 द्यावा, म्हणजे त्यांना पिक कर्ज मिळू शकेल, वनहक्क दावेदारांना पट्टे देण्याची प्रक्रिया करावी, राजुरा शहरातील सोनियानगर, इंदिरानगर, रमानगर, सोमनाथपुर येथिल नागरीकांना घर टॅक्स पावती द्यावी. शेतपिकाची वन्यप्राण्यापासुन होणा-या नुकसानीची योग्य भरपाई द्यावी व शेतीला सोलर तार कुंपन करून द्यावे, आदिवासी विद्यार्थ्यांसाठी डिबिटी योजना चुकीच्या पध्दतीने राबवित असल्याने रद्द करावी, न्यायालयाच्या दिनांक 06 जुलै 2017 च्या आदेशानुसार एक लाख पंचविस हजार पदावर ख-या आदिवासींची नौकरी भरती करावी, आदिवासी विद्यार्थ्यांना सेट, निट व पिएचडी संशोधक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती लागु करण्यात यावी आणि एवरेस्ट शिखर सर करणा-या आदिवासी विद्यार्थ्यांना नौकरी द्यावी इत्यादी मागण्या मोर्चाद्वारे करण्यात येणार आहे.
मोर्चात आदिवासी बांधवांनी मोठ्या संख्येत सहभागी होऊन आपला आवाज बुलंद करावा, असे आवाहन गोंडवाना गणतंत्र पार्टी तर्फे आदिवासी नेते महिपाल मडावी, रवींद्र आत्राम, आकाश गेडाम, प्रकाश वेडमे, संगीता मडावी, घनश्याम मेश्राम, शुभम आत्राम, राधाबाई आत्राम, मालतीताई मडावी, लक्ष्मीबाई मडावी, श्वेता शिडाम यांनी केले आहे.