चंद्रपुरात राज्य शासनाची प्रेतयात्रा
राष्ट्रीय ओबीसी महासंघाचा पुढाकार, आमदार सुधाकर अडबाले यांची उपस्थिती
चंद्रपूर : राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रवींद्र टोंगे यांनी ११ सप्टेंबरपासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. परंतु, राज्य शासनाने या आंदोलनाची अजुनही दखल घेतलेली नाही. त्यामुळे राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने आमदार सुधाकर अडबाले व राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजुरकर यांच्या उपस्थितीत रविवारी २४ सप्टेंबरला राज्य शासनाची प्रेतयात्रा काढून संताप व्यक्त करण्यात आला.
राज्याचे मंत्री तथा पालकमंत्री, केंद्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष व चंद्रपूरचे आमदार यांच्या निवासस्थानावर राज्य सरकारची प्रतिकात्मक तिरडी काढण्यात आली. आंदोलन स्थळापासून निघालेल्या यात्रेला बस स्टॅण्ड चौकात पोलिसांनी थांबविले. त्यानंतर आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेऊन पोलिस मुख्यालयात नेण्यात आले. त्यानंतर आंदोलकांना सोडण्यात आले.
या प्रतिकात्मक तिरडी आंदोलनानंतर प्रा. सूर्यकांत खनके व सतीश मालेकर यांनी मुंडण करून राज्य सरकारचा जाहीर निषेध व्यक्त केला. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, महाराष्ट्र सरकारने बिहारच्या धर्तीवर जातनिहाय जनगणना करण्यात यावी, ओबीसी विद्यार्थ्यांकरिता प्रत्येक जिल्ह्यात मुला व मुलींकरिता स्वतंत्र वसतिगृह व स्वाधार योजना सुरु करण्यात यावी या मागण्यांसाठी रवींद्र टोंगे यांनी उपोषण सुरू केले आहे. परंतु, टोंगे यांची प्रकृती खालावल्याने तातडीने शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर विजयराव बलकी व प्रेमानंद जोगी यांनी अन्नत्याग करीत उपोषण सुरू केले आहे. राज्य शासनाने अद्याप यावर कुठलाही ठोस निर्णय जाहीर केलेला नाही. त्यामुळे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार आहे.
तिरडी यात्रेत ॲड. पुरुषोत्तम सातपुते, ॲड. दत्ता हजारे, दिनेश चोखारे, बबनराव फंड, नंदू नागरकर, डॉ. अनिल शिंदे, निलेश बेलखेडे, कुणाल चहारे, महेश खंगार, भूषण फुसे, गोपाल अमृतकर, पांडूरंग टोंगे, अनिल धानोरकर, रवींद्र शिंदे, भास्कर ताजने, मनिषा बोबडे, कूसूम उदार, गोमती पाचभाई, अजय बलकी, अनिल डहाके, सचिन निंबाळकर, गणेश आवारी, पप्पू देशमुख, प्रफुल बैरम, अक्षय येरगुडे, भाविक येरगुडे, राहूल चौधरी, सतीश भिवगडे, राजेश नायडू, संदीप कष्टी, विलास माथनकर, देवा पाचभाई, डॉ. किशोर जेनेकर, राजेश बेले, प्रा. धनराज आस्वले, रत्नाकर चटप आदींसह मोठ्या संख्येने ओबीसी समाज बांधव सहभागी झाले होते.