अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. किशोर जोरगेवार

0
298

अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – आ. किशोर जोरगेवार

नाल्याचे रुंदीकरण करण्यासाठी निधीची घोषणा करण्याची अधिवेशनात बोलतांना केली मागणी

काल मंगळवारी चंद्रपूरात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांची पडझड झाली आहे. या नुकसनीचे पंचनामे करण्याचे आदेश तात्काळ देण्यात यावे, मदत केंद्र सुरु करण्यात यावे, येथील नाल्यांच्या खोलीकरण, रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्यात यावी अशी मागणी आज पावसाळी अधिवेशनात बोलतांना आमदार किशोर जोरगेवार यांनी केली आहे.
मंगळवारी चंद्रपूर शहरात झालेल्या पावसामुळे बाबूपेठ, आंबेडकर नगर, सिस्टर कॉलनी, जलनगर, रय्यतवारी कॉलरी, महाकाली कॉलरी, नानाजी नगर वडगाव, राष्ट्रवादी नगर, तुलसी नगर, वृदांवन नगर, इंडस्ट्रियल वार्ड, नेहरु नगर, उत्तम नगर, सरकार नगर या भागातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरले. त्यामुळे अनेकांच्या घरातील अन्नधान्य पाण्याने खराब झाले आहे. तर अनेक भागात घरांची पडझड झाली आहे. या सर्व परिस्थितीची आमदार जोरगेवार यांनी माहिती घेतली असून अश्या भागांची पाहणी करुन बेघर झालेल्या नागरिकांच्या राहण्याची तात्काळ व्यवस्था करा अशा सूचना त्यांनी मनपा आयुक्त विपीन पालिवाल यांना केल्या होत्या.
दरम्यान आज पावसाळी अधिवेशनाच्या तिस-या दिवशी पॉइंट ऑफ इंफॉर्मेशनवर बोलताना आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूरातील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीकडे सभागृहाचे लक्ष वेधले. यावेळी बोलतांना आ. जोरगेवार म्हणाले कि, चंद्रपूरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागातील वस्त्यांमध्ये पाणी शिरलेले आहे. घरांची पडझड झाली आहे. त्यामुळे सरकारने तात्काळ जिल्हाधिकारी यांना पडझड झालेल्या घरांचे पंचनामे करण्याचे आदेश द्यावे, लोकांना मदत केंद्रात नेण्यात यावे अशी मागणी केली आहे. सोबतच शहरातील अनेक नाले निमुळते झाले असल्यानेही नाल्यातील पाणी नागरी वस्तीत शिरल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे या नाल्यांच्या खोलीकरण आणि रुंदीकरणासाठी निधीची घोषणा करण्याची मागणीही यावेळी बोलताना त्यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here