रस्त्यासाठी गावकऱ्यांचा कंपनी विरोधात एल्गार
अल्ट्राटेक कंपनी समोर छेडले धरणे आंदोलन
शाळकरी विद्यार्थ्यां आदोंलनात सहभागी
नांदाफाटा प्रतिनिधी- मौजा पालगाव ते अल्ट्रा टेक सिमेंट कंपनीपर्यंतचा रस्त्याचे बांधकाम करावे या मागणीसाठी थेट कंपनीच्या प्रशासन भवना समोर गावकऱ्यांनी धरणे आंदोलन केले. गेल्या 30 वर्षापासून पालगाव ते कंपनी पर्यंतचा रस्ता कच्चा असून सदर रस्त्याचे काँक्रिटीकरण करावे अशी मागणी गावकरी करीत आहे. रस्त्या लगतच अल्ट्राटेक सिमेंट कंपनीची खदान असून रस्ता कच्चा स्वरूपात आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आता पावसाळ्यात खड्डे आणि चिखलाचा सामना करून ये-जा करावे लागत आहे.
गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असलेली ही मागणी असुन याकडे कंपनी प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही गावकऱ्यांनी केला आहे. वारंवार कंपनी प्रशासनाला सांगून निवेदन दिले असता याची दखल न घेतल्यामुळे शेवटी गावकऱ्यांचा संयम सुटल्याने गावकऱ्यांनी महिला, पुरुष, लहान विद्यार्थ्यांसह कंपनी प्रशासनाच्या प्रशासकीय इमारती समोरच धरणे आंदोलन सुरू केले. साधारणतः दोन ते तीन किमी अंतर असलेला हा रस्ता नांदा फाटा औद्योगिक वसाहतीला जोडणारा असून याच रस्त्याने गावकऱ्यांना बँक पोस्ट ऑफिस शाळा महाविद्यालय व गडचांदूर शहराकडे जावे लागते. रात्रपाळीत रस्त्याने प्रवास करणे जीवघेणे ठरले असून मोठे खड्डे मृत्यूला आमंत्रण देत आहे.
सोबतच रस्त्याच्या बाजूला असलेल्या खदानीमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. शेतकरी, कामगार, विद्यार्थांचे मोठे हाल होत आहे. सदर गाव कंपनी अंतर्गत दत्तक गाव येत असून या गावापर्यंत सिमेंट रस्ता करावा अशी मागणी याप्रसंगी गावकऱ्यांनी केली आहे. कोणतीही अनुचित घटना घडू नये या करिता गडचांदूर पोलीस ठाण्यात माहिती मिळताच पोलीस त्या ठिकाणी उपस्थित झाले.
या संदर्भात कंपनी प्रशासनाशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी गावच्या सरपंच अलका पायपरे, शैलेश लोखंडे, नरेंद्र मडावी, ग्रा.सदस्य अनिल आत्राम, विमल गेडाम, ज्योती कुंभारे, गौतम खोब्रागडे, अतुल निमसटकार, विठ्ठल मावलीकर, कवडू गेडाम यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक प्रमोद शिंदे, धर्मराज मुंडे, सुषमा अडकीने उपस्थित होते. कंपनी प्रशासनाचे कर्नल डे, मिश्रा, सचिन गोवरदिपे यांच्या सोबत चर्चा करून त्यांनी तात्काळ रस्त्याचे खड्डे बुजवून खडीकरण करून देण्यात येईल व त्यांनतर शासनाशी गावकऱ्यांच्या प्रतिनिधीला सोबत घेऊन बैठक घेण्यात येईल व तो स्थायी स्वरूपाचा सिमेंट काँक्रीट मजबूत रस्ता करण्यात येईल त्यासोबत रस्त्याच्या बाजूला लाईट ची व्यवस्था करण्यात येईल असे आस्वासन देण्यात आले. शिष्टमंडळाने कंपनीनी दिलेल्या आस्वासन ची माहिती गावकऱ्यांना दिली व त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनानंतर गावामध्ये सरपंच अलका पायपरे यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा घेण्यात आली. त्यावेळी उपस्थितांना शैलेश लोखंडे, नरेंद्र मडावी, कवडू गेडाम यांनी मार्गदर्शन केले.