स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘हर घर झेंडा’ अभियान

0
394

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान ‘हर घर झेंडा’ अभियान

जिल्हाधिका-यांनी घेतला आढावा

 

 

चंद्रपूर, दि.27 जून : भारतीय स्वातंत्र्याचे हे अमृत महोत्सवी वर्ष आहे. या अनुषंगाने केंद्र व राज्य सरकारच्या वतीने अनेक उपक्रम राबविण्यात येत आहे. याच उपक्रमाचा एक भाग म्हणून 11 ते 17 ऑगस्ट 2022 या कालावधीत ‘हर घर झेंडा’ अभियान जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. याबाबत शासनाच्यावतीने मार्गदर्शक सुचना प्राप्त झाल्या असून जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी सोमवारी आढावा घेतला.

 

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, निवासी उपजिल्हाधिकारी विशालकुमार मेश्राम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गहलोत, पोलिस उपअधिक्षक (गृह) राधिका फडके, तहसीलदार यशवंत दैट, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तालुक्यांचे तहसीलदार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी उपस्थित होते.

 

यावेळी बोलतांना जिल्हाधिकारी अजय गुल्हाने म्हणाले, 20 जून 2022 च्या शासन निर्णयानुसार स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जनतेच्या मनात स्वातंत्र्य लढ्याच्या स्मृती तेवत राहाव्यात, स्वातंत्र संग्रामातील अज्ञात नायक, क्रांतीकारक यांचे तसेच स्वातंत्र संग्रामात घडलेल्या विविध घटनांचे स्मरण व्हावे, स्वातंत्र्यासाठी चेतवलेले स्फुल्लिंग कायम तेवत राहावे व देशभक्तीची भावना जनमाणसात कायम राहावी, या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत आहे.

 

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर झेंडा’ अभियानांतर्गत जिल्ह्यातील जवळपास पाच लक्ष कुटुंबासाठी झेंडे तयार करण्याचे नियोजन आहे. 11 ते 17 ऑगस्ट या कालावधीमध्ये प्रत्येक शासकीय, निमशासकीय, खाजगी आस्थापना, सहकारी संस्था, शैक्षणिक संस्था यांनी त्यांच्या इमारतीवर तर नागरिकांनी स्वत:च्या घरावर स्वयंस्फुर्तीने राष्ट्रध्वजाची उभारणी करावी.  स्थानिक स्वराज्य संस्था, पोलिस यंत्रणा, शाळा व महाविद्यालये, परिवहन, आरोग्य केंद्रे, स्वस्त धान्य दुकाने, सहकारी संस्था अशा सर्वसामान्य नागरिकांशी निगडीत यंत्रणांचा वापर करून सर्वांनी योग्य नियोजन करावे, असे शासन आदेशात नमुद आहे. नागरिकांनी राष्ट्रध्वज स्वयंस्फुर्तीने लावायचा आहे. त्यासाठी ध्वजसंहितेच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक राहील. जाणते – अजाणतेपणे राष्ट्रध्वजाचा अपमान होणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिका-यांनी केले आहे.

 

असा राहील राष्ट्रध्वज : केंद्रीय गृह विभागाच्या 30 डिसेंबर 2021 रोजीच्या अधिसुचनेनुसार भारतीय ध्वज संहिता – 2002 भाग – 1 मधील परिच्छेद 1.2 मधील राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा विणलेल्या लोकर / सुत / सिल्क / खादी कापडापासून बनविलेला असेल, या तरतुदीमध्ये बदल करण्यात आला आहे. सदर बदलानुसार राष्ट्रध्वज हे हाताने कातलेल्या किंवा हाताने विणलेल्या किंवा मशीनद्वारे तयार केलेल्या सुत / पॉलिस्टर / लोकर / सिल्क / खादीपासून बनविलेल्या कापडाचे असावेत, असा उल्लेख केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here