28 गोवंशाला मिळाले जीवनदान, विरुर स्टेशन पोलिसांची कारवाई
राजुरा : विरुर स्टेशन येथील ठाणेदार राहुल चव्हाण यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे सोंडो गावानजीक असलेल्या पुलियाजवळ नाकाबंदी करून 28 गोवंशीय जनावरांना जीवनदान देण्यात पोलीस प्रशासनाला यश मिळाले. सदरची कारवाई आज करण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, नाकेबंदी केल्यानंतर राजुरा कडून लक्कडकोट मार्गे येत असणाऱ्या कंटेनर ला सोंडो जवळ अडवून पोलिसांनी झडती घेतली यात 28 गोवंशीय बैल आढळून आले. हि जनावरे निर्दयतेने कोंबून महाराष्ट्र सीमावर्ती भागातून तेलंगणा राज्यात कत्तलीकरिता घेऊन जाण्यात येत होती. यात आरोपी वसीम युनूस खान (३५) रा. बल्लारपूर, जितीन केशु विजयन (३०) रा. ईरूमतला जि. येरणागुंडम (केरळ), मोबीन फकरुद्दीन शेख (३०) रा. लक्कडकोट यांच्याविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९६७ चे कलम ५ (अ) (१) (५), ९, ११ व प्राण्यांना निर्दयतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६० चे कलम – ११ (१) (ड) अन्वये विरुर स्टेशन येथे गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या कारवाईत २८ नग बैल किंमत २ लक्ष ८० हजार रुपये व कंटेनर (टी एस १२ युडी ०५४९) किंमत १५ लक्ष रुपये असा एकूण १७ लक्ष ८० हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.
सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी राजा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि राहुल चव्हाण, पोहवा दिवाकर पवार, राहुल सहारे, मलय्या नरगेवार, पोशी स्वप्नील चांदेकर, विजय मुंडे, सुरेंद्र काळे, अतुल शहारे, प्रल्हाद जाधव, चालक नरेश शेंडे यांनी केली असून पुढील तपास ठाणेदार राहुल चव्हाण करीत आहेत.