भारतीय संविधान हीच लोकशाहीची खरी ताकत : सरपंच अंकुर मल्लेलवार
विठ्ठलवाडा येथे संविधान दिन साजरा
गोंडपिपरी : भारतीय संविधान हे समस्त जगासमोर आदर्श असून देशाची एकता व अखंडता कायम अबाधित ठेवण्याची ताकत या संविधानात आहे असे मत विठ्ठलवाडा येथील युवा सरपंच इंजी. अंकुर मल्लेलवार यांनी मांडले. गोंडपिपरी तालुक्यातील विठ्ठलवाडा ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
दि. २६ नोव्हेंबर रोजी झालेल्या संविधान दिनानिमित्त मान्यवरांनी संविधान कर्ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना वंदन करून त्यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. संविधान दिन हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय संविधानाच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने स्वीकारला. त्यामुळे २६ नोव्हेंबर हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने भारताच्या संविधानाबाबत गावातील जनता साक्षर व्हायला हवी, संविधान घराघरात पोचावे. नागरिकांना आपले हक्क व कर्तव्ये यांची पूर्णपणे जाणीव असावी. तसेच आपल्या संविधानाप्रति व लोकशाही मूल्यांच्या प्रति जागरूकता असावी यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाईल असे मत सरपंच अंकुर मल्लेलवार यांनी मांडले.
यावेळी उपसरपंच पायल देवतळे, ग्रा.पं. सदस्य विनोद मेश्राम, ग्रा.पं. सदस्या सोनी गौरकर, ग्रा.पं. सदस्या रेखा रामटेके, ग्रा.पं. सदस्या दर्शना दुर्गे, पोलिस पाटील शारदा पिंपळकर यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी आर.पी. तेलतुंबडे यांनी केले तर संचालन उपसरपंच पायल देवतळे यांनी केले.