बुरूड कामगारांना तात्काळ हिरवा बांबू पुरवठा करा,
अन्यथा आमरण उपोषण करू
संतोष पटकोटवार यांचा वनविभागाला इशारा
प्रतिनिधी प्रवीण मेश्राम
कोरपणा : गडचांदूर येथे अनेक वर्षांपासून बुरूड कामगार वास्तव्य करीत आहेत त्यांना उदरनिर्वाह करिता रोज हिरवा बांबू लागतो, बुरूड कामगारांना उत्तम रित्या जीवन जगता यावे यासाठी महाराष्ट्र शासन दरवर्षी प्रति कार्डधारकांना (1500) पंधराशे नग हिरवा बांबू पुरवठा करण्याचा शासन निर्णय आहे. परंतु वनविभागाच्या चुकीच्या धोरणामुळे शासन निर्णयाचा चुराडा होत आहे, बुरूड कामगारांना उदरनिर्वाह करिता हिरवा बांबू पुरवठा करावा अशी लेखी मागणी उपवनसंरक्षक, मध्य चांदा वनविभाग कार्यालय चंद्रपूर व जिल्हाधिकारी चंद्रपूर यांच्याकडे गेल्या एक वर्षा पासुन संतोष पटकोटवार यानी केली आहे मात्र वनविभाग या मागणीकडे सातत्याने दुर्लक्ष करीत असून निवड आश्वासन देत आहे. यामुळे बुरूड कामगारांची दिवसेंदिवस बिकट परिस्थिती निर्माण होत आहे, त्यांना नाईलाजाने गैर मार्गाचा वापर करून जंगलातील हिरवा बांबू तोडून आणावे लागत आहे. जर पंधरा दिवसाच्या आत वन विभागाकडून हिरवा बांबू पुरवठा न झाल्यास बुरूड कामगारांना सोबत घेऊन आमरण उपोषण करू असा इशारा बुरूड समाजाचे कोरपना तालुका सचिव तथा शेतकरी संघटनेचे सरचिटणीस संतोष पटकोटवार यानी दिला आहे.