घोडणकप्पी येथे व्यवस्थेच्या विरुद्ध बंडाचा एल्गार करून स्वतंत्र दिन साजरा

0
547

घोडणकप्पी येथे व्यवस्थेच्या विरुद्ध बंडाचा एल्गार करून स्वतंत्र दिन साजरा

 

स्वातंत्र्याच्या ७४ वर्षानंतरही घोडणकप्पी दुर्लक्षित

 

जिवती/प्रतिनिधी : देशभर स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव मोठ्या थाटात साजरा करत असताना घोडणकप्पी येथील आदिवासी बांधव व्यवस्थेच्या गुलामगिरीचे साखळदंड तोडण्यासाठी एकत्र येत सरसावले. स्वातंत्र्याचे ७४ वर्षानंतरही दुर्लक्षित ठेवणाऱ्या शासन प्रशासना च्या विरुद्ध बंडाचा एल्गार करत स्वतंत्र दिन साजरा केला.


जिवती तालुक्यातील माणिकगड पहाडावरील आदिम कोलामासाठी झटणाऱ्या कोलाम विकास फाउंडेशन तसेच छावा संघटनेच्या नेतृत्वात घोडणकप्पी या गावाला मुख्य रस्त्याशी जोडण्याच्या उद्देशाने श्रमदानातून रस्ता बनविण्याचा उपक्रम राबविण्यात आला.

 

 

ग्राम पंचायत भारी अंतर्गत घोडणकप्पी या गुडयाची खूप दयनीय अवस्था आहे. डोंगरदरीत वसलेल्या या वस्तीत जाण्यासाठी रस्ताही नाही.या वस्तीतील आदिवासी बांधव पाणी पिण्यासाठी नाल्यातील पाण्याचा वापर करतात.
या वस्तीवर शासकीय योजनेचा तर पार फज्जाच उडाला आहे. येथील दुरावस्थेबाबत शासन प्रशासन
अगदीच अनभीज्ञ असल्याचे चित्र आहे. येथील आदिवासी बांधवांचे सर्वच प्रश्नाकडे शासन प्रशासनाने कानाडोळा केल्याचा प्रकार दिसत आहे. सगळकाही आलबेल असल्याचा देखावा केला जात असला तरी येथील दयनीय अवस्था पराकोटीची अस्वस्थ मन हेलावून टाकणारी आहे.
स्वातंत्र्यदिनी घोडणकप्पी येथे निसर्गरम्य परिसरात गावपाटील जैतु रघु जुमानाके यांच्या हस्ते राष्ट्रीय ध्वज फडकविण्यात आला.
राष्ट्रध्वजाला वंदन करून सर्व जण देवी आईच्या
मंदिरासमोर पूजनासाठी जमले आणि देवी आईला साकडे घालून आपल्या झोपडीत असलेले टिकास,पावडे, घमेले, सबल, कुऱ्हाड, विळा इत्यादी साहित्य घेऊन विकास कुंभारे,अध्यक्ष, कोलाम विकास फाउंडेशन यांच्या नेतृत्वात गावाची वाट अडवणाऱ्या डोंगराच्या दिशेने निघाले. चवथ्या वर्गात शिकणाऱ्या अनिता शेकू गेडाम या चिमुकलीच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले आणि पहाड खोदण्यास सुरुवात करण्यात आली.जिवती तालुक्यातील शेकडो कोलामाचे हात एकवटले आणि घोडणकप्पीत इतिहास घडला वाटेत येणारे झाडे, पालव्या, गोटे, डोंगर इत्यादींना बाजूला सारीत गावासाठी वाट मोकळी करण्यात आली.

 

शासन प्रशासनातील अधिकारी पदाधिकारी याना ज्या रस्त्यावरून चालायला धजावत नव्हते ती वाट सोपी करण्यात आली. आता तरी अधिकाऱ्यांनी आमच्या गुड्यावर येऊन आमच्याशी संवाद साधावा आमचे प्रश्न जाणून घ्यावे एवढी साधी अपेक्षा तेथील गावकर्यांनी प्रतिनिधींशी बोलताना व्यक्त केली. गोंडगुड्यावरील लक्ष्मीबाई म्हणाली आम्ही पण मानस आहोत की जनावर हे त्यांनी एकदा येऊन पहावं आमचे मुलांना शाळेत जायला रस्ता नाही रस्त्यात जंगली जनावर असतात काही बरे वाईट होईल या भीतीने आम्ही मुलांना शाळेत पाठवत नाही. रस्ता बनल्यानंतर घाम पुसत गावकरी गावात एकत्र जमले आणि नागपूरचे ज्येष्ठ पत्रकार प्रमोद काळबांडे यांच्या साक्षीने रस्ता सरकारार्पण केले.

 

प्रमोद काळबांडे सकाळ वृत्तपत्र समूह नागपूर, यांचे अध्यक्षतेखाली मार्गदर्शनपर कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी प्रमुख अतिथी निलकंठराव कोरांगे माजी सभापती जि.प.चंद्रपूर, विकास कुंभारे कोलाम विकास फाऊंडेशन, ॲड.राजेंद्र जेनेकर श्रीगुरुदेव सेवा मंडळ, मनिषा चटप तनिष्का व्यासपीठ, बादल बेले नेफेडो, खुशाल ढाक सामाजिक कार्यकर्ते, ज्योत्स्ना मोहितकर,रजनी शर्मा नेफेडो, वैशाली काळबांडे, वज्रमाला बतकमवार, उज्वला जयपूरकर रत्नाकर चटप, दिपक साबने आदी मंडळी उपस्थित होती.
ॲड.राजेंद्र जेनेकर यांनी सूत्र संचालन केले तर प्रास्ताविक विकास कुंभारे यांनी मानले.

 

रस्ता निर्मितीच्या यशस्वीतेसाठी कोलाम विकास फाउंडेशन च्या खांद्याला खांदा लावून नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था, छावा संघटना, पाथ फाउंडेशन, मराठा सेवा संघ, तनिष्का व्यासपीठ, स्वरप्रिती कला अकादमी यासारख्या संस्था स्वंयप्रेरणेने सहभागी झाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here