गडचिरोली जिल्ह्यात गट शेतीमधून पीकक्षेत्र वाढविणे शक्य – पालकमंत्री एकनाथ शिंदे

0
462

गडचिरोली जिल्ह्यात गट शेतीमधून पीकक्षेत्र वाढविणे शक्य – पालकमंत्री एकनाथ शिंदे

ऑनलाईन व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे आढावा बैठक संम्पन्न

खरीप हंगामाच्या बैठकीत आधुनिक शेतीला चालना देण्याचेही दिले निर्देश

सूखसागर झाडे : गडचिरोली जिल्ह्यात बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत याचा सुयोग्य वापर करून गट शेतीच्या माध्यमातून जिल्हयातील पीकक्षेत्रामध्ये वाढ करण्याच्या सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. ऑनलाईन स्वरूपात त्यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली जिल्ह्यातील खरीप आढावा बैठक घेण्यात आली. गडचिरोली जिल्हयात अत्यल्प शेत जमीन धारक शेतकरी 45 टक्के आहेत. तसेच अल्प भुधारक 30 टक्के तसेच मोठे 25 टक्के आहेत. गट शेतीमधून पिक पध्दती निवडणे, शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेणे व शेतमाल विक्री यासाठी फायदे आहेत. जिल्हयात 1.67 लक्ष हेक्टर खरीप, 0.67 लक्ष हेक्टर रब्बी तर उन्हाळी 0.023 लक्ष हेक्टर पेरणी होते. यामुळे यामध्ये वाढ करून अजून शेतकऱ्यांना अर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करावेत असे सूचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या. या खरीप बैठकीला जिल्हाधिकारी दीपक सिंगला, खासदार अशोक नेते, आमदार अभिजीत वंजारी, आमदार डॉ.देवराव होळी, आमदार कृष्णा गजबे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशिर्वाद, कृषि अधिक्षक भाऊसाहेब बऱ्हाटे व उपविभागीय, तालुकास्तरीय कृषी अधिकारी उपस्थित होते.
जिल्हयातील पारंपारीक शेतीमध्ये आजच्या विकेल ते पिकेल या योजनेनूसार आधुनिकतेची जोड देवून नव नवे प्रयोग सुरू करावेत. नाविण्यपुर्ण पीक पध्दती निवडून शेती व्यवसायाला चालना देता येईल यासाठी प्रयत्न करावेत अशा सुचनाही त्यांनी यावेळी केल्या. जिल्ह्यात सद्या भात, कापूस, तूर, हरभरा, जवस व मका या पिकांना प्राधान्य आहे. यामध्ये काही ठिकाणी स्ट्रॉबेरी, ड्रॅगन फुड, नागली, तेल बीया पीक अशे नव नवे प्रयोग सुरू केले आहेत त्यामध्ये वाढ करावी. जिल्ह्यात औषधी वनस्पती मध्ये ही वाढ करता येईल. चांगल्या दर्जाची बियाणे वापरून व रासायनिक खतांचा कमी वापर करून शेतीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्पन्न घेता येते यासाठी नियोजन करावे असे आवाहन त्यांनी या बैठकीत उपस्थितांना केले. सिंचन क्षेत्रात वाढ करण्यासाठी कृषी विभागाने सुचविल्या प्रमाणे नदीकाठच्या शेतकऱ्यांना इंजिन, मोटर तसेच तुषार सिंचन यासाठी योजना आखावी त्यातून निश्चितच सिंचन क्षेत्र व लागवडी खालील क्षेत्र वाढण्यास मदत होईल असे मत व्यक्त केले.
या बैठकीत खासदार अशोक नेते व आमदार महोदयांनी आपापले विषय व समस्या मांडल्या. तसेच जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी खरीप हंगामाबाबत माहिती दिली. कृषी अधिक्षक गडचिरोली भाऊसाहेब बऱ्हाटे यांनी नियोजनाबाबत व जिल्हयातील नाविण्यपुर्ण उपक्रमांबाबत सादरीकरण केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here