फटाक्यांऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करा-जिल्हाधिकारी

0
355

फटाक्यांऐवजी दिव्यांची आरास करून दिवाळी साजरी करा-जिल्हाधिकारी

चंद्रपूर शहरात फटाके फोडण्यास बंदी

चंद्रपूर,दि.11 नोव्हेंबर: राष्ट्रीय हरीत लवादाच्या आदेशानुसार चंद्रपूर शहर महानगरपालीकेच्या हद्दीत संपुर्ण प्रकाराच्या फटाक्यावर व आतीषबाजीवर पुर्णत: बंदी घालण्यात आली आहे. फटाक्यामुळे मोठ्या प्रमाणात वायु प्रदुषण होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात येते. आपल्याकडे पारंपरिक सण आणि उत्सवांना महत्त्व आहे, मात्र ते साजरे करताना पर्यावरणावर व आरोग्यावर प्रतिकूल परिणार होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्यावी.दिवाळीत फटाक्यांमुळे वायू आणि ध्वनिप्रदूषण होऊ नये, यासाठी सर्वांनी पर्यावरणपूरक, प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांनी केले आहे.

दिवाळीत फटाक्यांवर बंदी असली तरी पर्यावरण पुरक फटाके फोडण्यास रात्री 8 ते 10 या कालावधीत मुभा  देण्यात आली आहे. तथापि पर्यावरणपूरक फटाके म्हणजे नेमके काय, याबाबत जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले की, नियमित फटाक्यांना पर्याय म्हणून नीरीच्या शास्त्रज्ञांनी पर्यांवरणपूरक फटाके तयार केले असून त्या फटाक्यांना ‘स्वास’, ‘सफल’ आणि ‘स्टार’ अशी नावे देण्यात आली आहेत. यामध्ये छोटे बॉम्ब, मोठे बॉम्ब आणि अनार (फ्लावर पॉट) चा समावेश आहे. या फटाक्यांमध्ये हानिकारक आणि विषारी रसायने नाहीत. त्यामुळे या ग्रीन फटाक्यांचा वापर केल्याने हवेत सल्फर डायऑक्साईड आणि नायट्रोजन डायऑक्साईडचा हानिकारक प्रदूषण 60 टक्क्यांपर्यंत कमी होते. तरी असे फटाके फोडण्यास मनाई नसली तरी नागरिकांनी शक्यतोवर फटाक्यांऐवजी दिव्यांची आरास मोठ्या प्रमाणात करून दिवाळी उत्सव साजरा करावा, असेही जिल्हाधिकारी गुल्हाने यांनी सांगितले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here