नेते प्रचारात व्यस्त, जनता पाण्याअभावी त्रस्त
चंद्रपूर :- लोकसभा निवडणूक 2024 ची रणधुमाळी सुरू झाली आहे, प्रशासन निवडणूक यंत्रणेत कार्यरत आहे तर गावागावातील नेते आपापल्या उमेदवाराच्या प्रचाराला लागलेले आहेत परंतु यामुळे दुर्गम भागातील मूळ समस्यांकडे प्रशासनाचे दूर्लक्ष होतांना दिसत आहे.
जिल्ह्यातील अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या जिवती तालुक्यातील असंख्य गावांमध्ये बिकट पाणी टंचाई चा सामना स्थानिक नागरिकांना करावा लागत आहे.
जिवती तालुक्यातील लंबोरी ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या गाव कुरसनगुडा भुरीयेसापूर या आदिवासीबहुल भागात पाण्यासाठी दोन बोअरिंग आहेत परंतु दोन्ही बोरिंगला अगदी तुटक तुटक पाणी येत त्यामुळे तासंतास पाण्यासाठी वाट पहावी लागते, एक घागर भरली की परत पाणी येण्यासाठी तास दोन तास बोरिंग हलवावी लागते यामुळे स्थानिकांना बिकट पाणीसमस्या निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी याची तक्रार ग्रामपंचायत ला केली आणि ग्रामपंचायत ने पंचायत समिती व तहसील कार्यालयापर्यंत पाठपुरावा करूनही याची दखल घेण्यात आली नाही.
समाजसेवक भूषण फुसे यांनी स्थानिकांना निर्माण होणारी बीकट पाणीसमस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा प्रशासना विरोधात स्थानिक नागरिकांना घेऊन घागर मोर्चा काढू असा इशारा दिला आहे.