गोदी कामगारांच्या मागण्यांसाठी एकजुटीने लढा देण्याची गरज – ॲड. एस. के. शेट्ये
जगदीश का. काशिकर,
कायदा (लॉ) / सुरक्षा सल्लागार (कन्सलन्टंट) व मुक्त पत्रकार, महाराष्ट्र. व्हाटसअप – ९७६८४२५७५७
मुंबई: भारतील प्रमुख बंदरामध्ये पूर्वी ३ लाख गोदी कामगार होते, आज २२ हजार कामगार शिल्लक राहिले आहेत. मुंबई बंदरात पूर्वी ४० हजार कामगार होते, आज ४ हजार कामगार आहेत, कमी कामगारांमध्ये काम केले जाते. केंद्र सरकारचे धोरण हे खाजगीकरण करण्याचे आहे. पेन्शन फंडातील तूट, नवीन कामगार कायदे, द्विपक्षीय वेतन समितीसमोरील जाचक अटी, मागील वेतन करारातील थकबाकी अशी अनेक आव्हाने आज गोदी कामगार चळवळी समोर आहेत, या व इतर सर्व मागण्यांसाठी आपणांस एकजुटीने लढा देण्याची गरज आहे. असे स्पष्ट उदगार ज्येष्ठ कामगार नेते ॲड. एस. के. शेट्ये यांनी सत्कार सोहळ्याच्या सभेत काढले.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभातील कमगारांतर्फे २० जून २०२२ रोजी इंदिरा गोदीत हमालेज बिल्डिंग, पहिला माळा येथे मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी व मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे नवीन बोर्ड मेंबर श्री. दत्ता खसे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनच्या खजिनदार व मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या नवीन बोर्ड मेंबर श्रीमती कल्पना देसाई, मुंबई पोर्टचे माजी विश्वस्त श्री. सुधाकर अपराज, केरसी पारेख, ट्रॅफिक मॅनेजर श्री. आर. एन. शेख यांचा सत्कार सोहळा ॲड. एस. के. शेट्ये यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.
गोदी कामगार नेते व मुंबई पोर्टचे माजी विश्वस्त श्री. सुधाकर अपराज यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, मेजर पोर्ट ऑथोरीटी ॲक्ट २०२१ अन्वये युनियनने केलेल्या शिफारशी नुसार नोकरीत असलेले कामगार म्हणून दत्ता खेसे व कल्पना देसाई यांची मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे नवीन बोर्ड मेंबर म्हणून नियुक्ती झाली आहे. पहिल्याच बोर्डाच्या मिटिंगमध्ये दोन्ही बोर्ड मेंबरनी गोदी कामगारांची थकबाकी देण्याची मागणी केली. १ जानेवारी २०२२ पासून लागू होणाऱ्या वेतन करारासाठी पोर्ट प्रशासनाने पोर्टनुसार करार, अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार नको, घरभाडे भत्ता कमी करणे अशा अनेक जाचक अटी घातल्या आहेत, या अटी आम्हाला मान्य नसून त्याविरुद्ध गोदी कामगारांना लढावे लागेल. मुंबई पोर्टचे माजी विश्वस्त श्री. केरसी पारेख यांनी आपल्या शुभेच्छापर भाषणात सांगितले की, एल. आय. सी. कडे गोदी कामगारांच्या पेन्शनसाठी असलेल्या पेन्शन फंडात तेरा हजार कोटी रुपये शिल्लक पाहिजेत परंतु आता आठ हजार कोटी शिल्लक असून पाच हजार कोटी रुपये कमी आहेत. मुबई पोर्टला येणाऱ्या उत्पन्नातून या फंडात पैसे भरणे गरजेचे आहे.
मुंबई पोर्ट प्राधिकरणाचे नवीन बोर्ड मेंबर श्री. दत्ता खेसे यांनी आपल्या भाषणात सांगितले की, आपल्या सर्वांच्या सहकार्याने कामगारांची बाजू बोर्डामध्ये मांडून कामगारांना न्याय देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल. गोदी कामगारां समोर अनेक आव्हाने आहेत. येणाऱ्या आव्हानांचा आपण एकजुटीने सामना करू.
याप्रसंगी मुंबई पोर्ट ट्रस्ट डॉक अँड जनरल एम्प्लॉईज युनियनचे सेक्रेटरी विद्याधर राणे, विजय रणदिवे, ट्रान्सपोर्ट अँड डॉक वर्कर्स युनियनचे सेक्रेटरी राजाराम शिंदे, मुंबई पोर्ट ट्रस्ट स्थानीय लोकाधिकार समितीचे अध्यक्ष मिलिंद घनकुटकर, कार्याध्यक्ष संजय माधव, मुंबई पोर्ट प्राधिकरणाच्या गोदी विभागातील अधिकारी तिवारी, चैतन्य राऊत, शशिकांत हांडे आदी मान्यवरांची शुभेच्छापर भाषणे झाली. सभेचे सूत्रसंचालन मारुती विश्वासराव यांनी केले तर आभार मीर निसार युनूस यांनी मानले. सभेच्या सुरवातीला संतोष सकपाळ यांनी गणेशस्तवन म्हंटले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रदीप नलावडे, विजय चोरगे, अशोक खताळ, संदीप घागरे, जे.पी. मुजावर, बबन हडवळे, रमेश गुरव, राजेंद्र खोपडे इत्यादी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.