पांदण शेत रस्त्यांचे गावोगावी असलेले प्रश्न आता सुटणार
कोठारी/राज जुनघरे : राज्यात असलेल्या महाविकास आघाडी सरकारची स्थापना होताच मनरेगा अंतर्गत सुरु असलेल्या योजनेचे नामकरण करुन मातोश्री ग्रामसमृध्दी शेत, पाणंद रस्ते योजना असे करण्यात आले होते. त्यानंतर आता या योजनेवर सरकारने भर दिला आहे. केवळ नामकरणच नाही तर प्रत्यक्षात पाणंद रस्ते पक्के करण्याच्या अनुशंगाने राज्य सरकारने पावले उचलण्यास सुरवात केली आहे. याची अंमलबजावणी ही तीन टप्प्यात होणार असून यामध्ये एका गावाहून दुसऱ्या गावाला जाणारा रस्ता, शेतामध्ये जाण्याचे पायमार्ग तसेच गाडीमार्ग तयार करण्यात येणार आहेत. सध्या प्रतेक गावच्या शिवारामधे रस्त्याचा प्रश्न मोठा गंभीर झालेला आहे. ग्रामपंचायत पातळीवर या मार्गाचा आराखडा तयार करुन त्यानुसार रस्ते तयार होणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला प्रश्न अखेर मार्गी लागणार आहे. शेतरस्ते हे दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. यामुळे शेतकरी सरकारच्या या निर्णयामुळे मोठे आनंदी झाले आहेत.
ग्रामपंचायतीची राहणार आहे महत्वाची भूमिका
पाणंद रस्ते हा शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा विषय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मागणीनुसार ग्रामपंचायतीला याचा आराखडा तयार करावा लागणार आहे. यामध्ये आता अतिक्रमणाचा विषय येणार असून त्या प्रसंगी ग्रामपंचायतीने मध्यस्तीची भूमिका घेऊन शेतकऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढावा लागणार आहे. या कामामध्ये ग्रामपंचायत मध्यस्थीची भुमिका घेणार असल्याने रस्ते लवकरात लवकर पूर्ण केले जातील . शिवाय ग्रामपंचायत स्तरावर ही प्रकरणे निकाली नाही निघाली तर मात्र, तालुका स्तरीय समितीकडे हा वाद सादर करुन त्यावर पोलीस यंत्रणेची मदत घेऊन प्रश्न मार्गी लावला जाणार आहे.
अशाप्रकारे मिळणार मंजुरी
स्थानिक पातळीवर ग्रामपंचायतीअंतर्गत सर्व गावांमध्ये आवश्यक असलेल्या रस्त्यांचा आराखडा ग्रामसभेत मंजुर करावा लागणार आहे. त्यानंतर गटविकास अधिकारी ही यादी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना व त्यानंतर सीईओ यांना. जिल्हा परिषदेचे सीईओ हे ३० जूनपर्यंत रोजगार हमी योजनेच्या सचिवांना यादी सादर करणार आहेत. शिवाय या याद्यांवर अभ्यास करुन सचिव मंत्र्यांकडे प्रस्ताव सादर करणार आहेत. १५ ऑगस्ट पर्यंत मंजुरी मिळून प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे.
सदर रस्ते सार्वजनिक बांधकाम विभागाच्या मापदंडानुसार बांधण्यात येणार आहेत. जागेच्या उपलब्धतेनुसार रुंदीमध्ये फरक पडेल मात्र, ऊंची, खडीचा आकार, खडी परताची जाडी, पाणी निचऱ्यासाठी नाली, बाजूची झाडे, गुणवत्तेची चाचणी ही केली जाणार आहे. योग्य ते मापदंड लावून रस्ता चांगल्या प्रतीचा कसा होईल यावरच लक्ष केंद्रीत केले जाणार आहे. या दरम्यान, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना चर खोदून त्यामध्ये निघालेली माती आणि मुरुम हे रस्त्यात टाकण्यात येणार आहे.
या योजनेमुळे शेतकरी यांना धिर आला आहे. शेतीच्या मशागतीसाठी आता वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्र आली आहेत मात्र रस्ता नसल्याने मोठी अडचण येत होती ती सुटणार आहे.