गडचांदूर शहरातील देशी दारूची दुकाने गावाबाहेर स्थानांतरित करा – मदन बोरकर यांची मागणी
कोरपना प्रतिनिधी
गडचांदूर शहरात शहराच्या अत्यंत मध्यभागी देशी दारूची दुकाने पूनच्छ सुरू झालेली आहेत. अचानक चौक या वर्दळीच्या ठिकाणी श्री गुलाब शेंद्रे यांचे देशी दारूचे दुकान सुरू झाले असून परिसरात मोठे दुर्गा मातेचे मंदिर असल्याने भाविकांची व लागूनच चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती बँक असल्याने सामान्य शेतकरी, शिक्षक, निराधार महिला, विद्यार्थी अश्या अनेक नागरिकांची मोठी ये-जा सुरू असते. अनेकदा या ठिकाणी तडिरामांनी मंदिरात येणाऱ्या भाविकांना, बँकेत येणाऱ्या ग्राहकांना चिल्लर पैश्या करिता त्रास देणे व महिलांना छेड छाड करणे सुरू केले आहे. परिसरातील रहिवासी बांधवांना व व्यापारी बांधवांना याचा मोठा त्रास सुरू झाला आहे.
त्याचप्रमाणे स्टेट बँक ऑफ इंडिया जवळ श्री रउफ खान व इतरांचे देशी दारू दुकान सुरू झाले असून एकमेव राष्ट्रीयकृत बँक असल्याने परिसरातील बँकेचे पुरुष, महिला, विद्यार्थी, शेतकरी, नौकरदार ग्राहकवर्ग सदर दारू दुकानमुळे त्रस्त झालेला आहे. बँकेच्या परिसरात छेडखाणीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे, यावर अंकुश लावणे कठीण झाले आहे. तसेच राजीव गांधी चौक येथे श्री भाऊराव रणदिवे व शहीद बिरसा मुंडा चौक येथे श्री दिगंबर लांजेकर व इतरांची दुकाने सुरू झाल्याने मोठ्या प्रमाणात गंभीर अपघात होत आहे.
करिता सदर सर्व गडचांदूर शहरातील देशी दारू दुकाने शहराच्या बाहेर तात्काळ स्थानांतरित करण्यात यावे अशी मागणी भीम आर्मीचे जिल्हा उपाध्यक्ष मदन बोरकर यांनी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना निवेदनाद्वारे केली.