दिवाळी निमित्य परगावी जाण्याच्या बेतात घराच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करू नका – ठाणेदार सत्यजीत आमले
कोरपना, प्रवीण मेश्राम
“मामाच्या गावाला जाऊ या” असे आश्वासन पालक आपल्या मुलांना देत असतात. असे असताना उन्हाळ्यातील सुट्या बरोबरच दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर कित्येक नागरिक परिवारासह नातेवाईकांकडे परगावी जातात आणि घरात कुणीच नसल्याने चोरांना मोकळे रान मिळते. चोर संधीचे सोने करून पसार होतात. याची माहिती सुद्धा पोलीसांना मिळत नाही. संबंधित परिवार गावी परतल्यानंतरच घटनेची माहिती होते. तेव्हा फार उशीर झालेला असतो. म्हणून दिवाळीच्या मुहूर्तावर सुट्या घालवण्यासाठी परगावी जाण्याच्या बेतात घरांच्या सुरकक्षेकडे दुर्लक्ष करू नका असे आवाहन गडचांदूर पोलीस स्टेशनचे ठाणेदार सत्यजीत आमले यांनी केला आहे.
प्रत्येक परगावी जाणाऱ्या नागरिकांनी सुरक्षेच्या दृष्टीने घरी असलेली मौल्यवान वस्तू,रोख रक्कम घरात ठेवू नये. स्वतःच्या घराचे मुख्य द्वारासह घराच्या मागील दरवाज्यांची कडी, कोंडा व कुलुप मजबूत लावावे तसेच जाताना घर शेजाऱ्यांना माहिती द्यावी. वेळप्रसंगी शेजाऱ्यांना दूरध्वनीवरून संपर्क साधून माहिती घेत रहावे. तसेच महत्वाचे म्हणजे गावाबाहेर जाताना शक्यतो आपल्या घराचा संपूर्ण पत्ता, दुरध्वनी क्रमांक पोलीस स्टेशनात माहिती द्यावी. जेणेकरून पोलीसांना गस्ती दरम्यान सदर घरास भेट देऊन पाहणी करता येईल. आपापल्या मालमत्तेचे रक्षणासाठी या सुचनांचे पालन केल्यास भविष्यात होणारी अप्रिय घटना टाळता येईल. अशाप्रकारे आपापल्या मालमत्तेचे रक्षण तर करावेच याचबरोबर कोणीही अनोळखी व्यक्ती किंवा महिला संशयितरित्या वावरताना आढळल्यास याची माहिती पोलीस स्टेशनला द्यावी असे आवाहन ठाणेदार आमले यांनी शहर वासीयांना केले आहे.