घाटकुळची बालपंचायत ठरतेय जिल्ह्यात दिशादर्शक !
– युनिसेफच्या उपक्रमाला ग्रामपंचायतीची जोड
– गावात बालआरोग्य, शिक्षण, प्रबोधनासाठी पुढाकार
– बालकच बालकांच्या विकासासाठी तत्पर
अविनाश पोईनकर
चंद्रपूर :
बालकांचे हक्क व अधिकार तसेच सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने बालस्नेही प्रकल्प जिल्हा परिषद व युनिसेफच्या माध्यमाने जिल्ह्यातील वरोरा व पोंभुर्णा तालुक्यात ४१ ग्रामपंचायतीत सुरु आहे. या अंतर्गत आदर्श ग्राम घाटकुळची बालपंचायत बालकांच्या समस्या निवारणासह ग्रामविकासात महत्त्वाची भुमिका बजावत आहे. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने येथील बालपंचायत जिल्ह्यात प्रेरणादायी व दिशादर्शक ठरत आहे.
६ ते १८ वयोगटातील बालकांची बालस्नेही प्रकल्पाअंतर्गत बालपंचायत समीती स्थापन करण्यात आली. यात सरपंच, उपसरपंच, सदस्य अशी मुलांची निवड करण्यात आली. शिक्षण समीती, आरोग्य समीती, पोषण समीती, बालसंरक्षण समीती अशा उपसमीत्या तयार करण्यात आल्या असून यात गावातील मुलांचा समावेश आहे. मुले बालपंचायतीच्या माध्यमाने गावात प्रत्यक्ष प्रबोधनाचे कार्य करत आहे.
बालपंचायत ही तशी बालकांची ग्रामपंचायतच आहे. बालपंचायतीची मासिक बैठक मुले घेत असून गावात करावयाच्या कामाचे ते नियोजन करतात व अंमलबजावणी करतात. गावात कुणीही शाळाबाह्य मुले राहू नये यासाठी कार्य करणे, कुपोषणग्रस्त मुले राहू नये यासाठी प्रत्यक्ष अंगणवाडी व शाळेत पोषण आहाराची पाहणी पाहणे. बालकांचे शोषण, बालकामगार, बालअत्याचार यावर प्रतिबंध घालणे. व्यसनमुक्तीसाठी कार्य करणे. मुलांच्या अभ्यासाकडे विशेष लक्ष देणे. गावात ग्रामस्वच्छता अभियान, प्लाॅष्टीक बंदीची अंमलबजावणी करणे, आदी कामे बालपंचायतीच्या माध्यमाने मुले करत आहे. जिल्ह्यात सर्वोत्कृष्ठ बालपंचायत म्हणून घाटकुळच्या बालपंचायतीची ओळख असून राज्यपातळीवर विशेष स्थान मिळवले आहे. येथील बालपंचायतीच्या सरपंच काजल चांगदेव राळेगावकर यांनी तत्कालीन जिल्हाधिकारी कुणाल खेमणार, मुख्य कार्यकारी अधिकारी राहूल कर्डीले यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात कामाची भुमीका मांडली तेव्हा त्यांनी कौतुक केले होते. नुकतेच देशपातळीवर युनिसेफच्या तज्ञासोबत चर्चासत्रातही सरपंच काजलने सहभाग नोंदवला. घाटकुळच्या बालपंचायतीला युनिसेफच्या वर्षा रामटेके, प्रेरक मुकुंदा हासे, संदिप शिंदे यांचे विशेष मार्गदर्शन मिळत आहे.
बालपंचायतीचे उपसरपंच राकेश अनिल हासे, सदस्य जयश्री सुदर्शन खोबरे, अतुल श्रीकृष्ण वरवाडे, काजल सुनिल राऊत, अमीर गणपती देठे, व्यंकटेश चांगदेव राळेगावकर, पल्लवी सुधाकर गिरोले, केतन विठ्ठल धंदरे, नेत्रा देवानंद खोबरे, शुभांगी वसंत खोबरे, प्रथम शंकर वाकुळकर, स्नेहा अरुण मडावी, सौरव दामोधर राऊत, कांचन अनिल पावडे, मनोज मारोती भट्ट, मंथन दत्तू पावडे, भाग्यश्री सुदर्शन खोबरे, करण हिवराज पाल, शुभम किशोर राऊत, रोहीत वामन कुद्रपवार, अस्मीता रमेश वाकुळकर, साहिल अरुण पावडे, करिश्मा प्रभाकर खोबरे, दामीनी बाळू मेदाळे, साहिल सखाराम चौधरी, तुशार बाळू देशमुख, रिया उत्तम देशमुख, योगेश चंदू शिंदे यासह गावातील शेकडो मुले बालपंचायतीत कार्यरत आहे. यंदा पोंभुर्णा तालुक्यात दहावी आणि बारावीच्या परिक्षेत देखील येथील बालपंचायतीचे सदस्य असलेल्या मुलांनी गुणवत्ता यादीत येत अव्वल स्थान पटकावले. ग्रामपंचायत या उपक्रमाला विशेष सहकार्य करत असून हा उपक्रम गावांसाठी दिशादर्शक तसेच प्रेरणादायी ठरत आहे.
••••••
बालपंचायतीच्या माध्यमाने गावात सकारात्मक बदल होत आहे. बालकांना सुसंस्कारासोबत बालकांचे हक्क, अधिकार, कर्तव्ये व कायदेविषयक माहिती प्रत्येक बैठकीत आम्ही देतो. या उपक्रमामुळे मुले जागृत झाली असून गावात बाल आरोग्य, शिक्षण यासाठी प्रबोधन व प्रत्यक्ष कार्य मुले करत आहे. बालपंचायतीमुळे गावाच्या नावलौकीकात भर पडत आहे.
– मुकुंदा हासे
प्रेरक, बालपंचायत घाटकुळ••••••