सिम कार्डच्या कवरेज पायी ग्राहकांना नाहक त्रास, अनेक भागात नेटवर्कच नाही !

0
445

सिम कार्डच्या कवरेज पायी ग्राहकांना नाहक त्रास, अनेक भागात नेटवर्कच नाही !

काेरपना – प्रतिनिधी प्रवीण मेश्राम

कोरोना विषाणूच्या संसर्गापासून रोखण्यासाठी शासनप्रशासन शर्थीचे प्रयत्न करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे. घरी रहा,सुरक्षित रहा,असे आवाहन जनतेला वारंवार करण्यात येत आहे.रस्त्यांवरची गर्दी वाढू नये,कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावण्यातआले.घरी बसु बसु कंटाळा येऊ नये म्हणून लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना मंत्रमुग्ध करणारे जुने सिरियल टिव्हीवर करमणुकीसाठी शासनाने पुन्हा सुरू केल्याचे चित्र आहे.कोरोनाला हरवण्यासाठी लोकांनी घरी बसावे हा उद्देश शासनाचा असून नाईलाजाने का होईना मात्र नागरिकांनी स्वतःला घरातच कोंडून ठेवले आहे.बाहेर जाता येत नसल्याने नातेवाईक तथा मित्र मंडळींना संपर्क साधण्याचे एकमेव साधन म्हणजे मोबाईल फोन.मात्र सिमकार्डला कवरेज नसल्याने ग्राहकांना मोठया मानसिक आर्थिक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. कोरपना,जिवती तालुक्यातील हजारो नागरिक वोडाफोन,आयडिया,जिओ,एअरटेल अशा नावाजलेल्या कंपन्यांचे सिम वापरत आहे. मात्र नेटवर्क नसल्याने संपर्क होत नसून पैसा खर्च करून ही विनाकारण मनस्ताप सहन करावा लागत असल्याची बोंब सुरू आहे.
हल्ली बरेच जण फेसबुक,व्हॉट्सअँप, इन्स्टाग्रामचा वापर करतात.चिमुकल्या पासून तर वयोवृद्धांपर्यंत सगळ्यांनाच मोबाईलचे वेड लागले आहे.मोबाईल इतर जीवनावश्यक वस्तूंच्या श्रेणीत एक महत्वाचे घटक बनले असून नेटवर्क नसल्याने मोठी गैरसोय होत आहे.जर महागडे रिचार्ज करूनही सिमकार्ड कंपन्या व्यवस्थित सुविधा देत नसेल तर ही गोरगरीब ग्राहकांची सपशेल फसवणूकच,असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.सदर प्रकार डिजिटल इंडियाचे भव्यदिव्य स्वप्न दाखवणार्‍यांना धडा असून नेटवर्क न पुरवणाऱ्या सिमकार्ड कंपन्यांवर कारवाई करणे काळाची गरज बनली आहे.हजारोंचे मोबाईल हँडसेटला नेटवर्क नसल्याने मोबाईल निव्वळ शोभेची वस्तू बनल्या आहे.हल्ली कुणालाही विचारले तर एकाच उत्तर मिळते, “काय राव….!मोबाईलला नेटवर्कच नाही” अनेक शासकीय काम आँनलाईन पद्धतीने होत असल्याचे चित्र असून कवरेजमुळे कामांची गती मंदावली आहे.वापर जास्त आणि नेटवर्क कमी” अशी परिस्थिती असून गोरगरिबांना मोठ्याप्रमाणात याचा फटका बसत आहे.
या सिमकार्ड कंपन्यांनी ग्राहकांना अक्षरशः वेठीस धरले असून एकतर फोन लागत नाही आणि लागलाच तर संभाषण नीट होत नाही. कधी कधी तर एकाला लावले तर चक्क दुसऱ्याच अनोळखी व्यक्तीला फोन लागतो. लहान साधे मोबाईल फोन धारक तर गेल्या एक महिन्यापासून कवरेजमुळे त्रस्त असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.कवरेज नसल्याने व्हॉट्सअँप,फेसबुक चालत नाही.एकीकडे सुविधांची बोंब असताना चार दिवसापुर्वीच सिमकार्ड कंपन्यांकडून वारंवार रिचार्ज संपत असल्याची आठवण करून दिली जाते.पैसे खर्चून ही नेटवर्क नसल्याची बोंब सुरू असून संबंधित विभागाने याकडे लक्ष देऊन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत व्यक्त होत आहे.सिमकार्ड कंपन्या मस्त,ग्राहक त्रस्त अशी अवस्था सध्या पहायला मिळत असून ग्राहकांकडून हजारोंचे रिचार्ज करून घेतात मग सुविधा का देत नाही ? असा निर्वाणीचा प्रश्न ग्राहकांकडून उपस्थित केला जात आहे.संबंधित विभागाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले की काय अशी शंका वर्तवली जात असून मागणीनुसार पुरवठा,हे धोरण स्वीकारून शहरांसह विशेषतः खेड्यापाड्यातील कानाकोपऱ्यात नेटवर्क पोहचवण्याची व्यवस्था करावी अन्यथा शहरात लोकांना मनस्ताप ठरलेले टावर बंद करावे अशी मागणी अनेक त्रस्त सिमकार्ड मोबाईल धारकांनी संबंधित विभागाकडे केली असून असे असताना आता सिमकार्ड कंपन्यांच्या कवरेज विषयी संबंधित विभागाची भूमिका काय राहणार हे पाहणे अत्यंत उत्सुकतेचे ठरणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here