आगीत होरपळून एक बैल दोन गायी ठार, पाचगाव येथील घटना
राजुरा, 4 ऑगस्ट (अमोल राऊत) : राजुरा तालुक्यातील पाचगाव (मडावीगुडा) येथे काल रात्री साडे अकराच्या सुमारास गोठ्याला लागलेल्या आगीत होरपळून एक बैल व दोन गायी ठार झाल्याची घटना घडली. या आगीत एक बैल सुदैवाने बचावलेला बैल तीस टक्के जळाला आहे.
गोविंदा मडावी यांच्या गोठ्याला काल रात्री आग लागली. सर्व गावकरी झोपेत असल्यामुळे आग नागरिकांच्या लक्षात आली नाही. आगीची भीषणतेमुळे गोठ्यातील बैल व गायींसह कोंबड्या, शेतीअवजारे, खत व कीटकनाशके जळून खाक झाली. गोठ्यावरील लाकूड फाट्याचे मोठे नुकसान झाले. 2 लाख रुपयांच्या आसपास शेतकरी गोविंदा मडावी यांचे नुकसान झाले. ऐन शेती हंगामात त्यांच्यावर या घटनेमुळे आभाळ कोसळले आहे. तलाठी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. यावेळी गावकऱ्यांनी सदर शेतकऱ्याला शासकीय मदत मिळवून देण्याची मागणी केली.
