नगरपरिषद प्रशासनाला जाग केव्हा येणार ?
अमोल राऊत
राजुरा(चंद्रपूर): पाणी म्हणजे जीवन. पाण्याच्या बचावासाठी प्रशासनाकडून वेळोवेळी उपाययोजना करण्यात येऊन जनजागृती करण्यात येते. मात्र नगरपरिषद राजुरा प्रशासन याला अपवाद असल्याचे चित्र चिकन मार्केट येथे पाहावयास मिळत आहे. नाका नंबर ३ येथील आठवडी बाजार लगत असलेल्या चिकन-मटन, मच्छी मार्केटला पाणी पुरविणाऱ्या २००० लिटर सींटेक्सच्या पाण्याची टाकी एक महिन्यापासून फुटली आहे. चिकन मार्केट येथे
स्थानिकांकडून याची माहिती नगरपरिषद प्रशासनाला दिली. मात्र एक महिना उलटूनही यावर कोणतीच प्रभावी उपाययोजना करण्यात आलेली नाही. यामुळे नगरपरिषद प्रशासनाला जाग केव्हा येणार असा प्रश्न जनतेतून विचारला जात आहे.
नगर परिषद राजूऱ्याच्या अखत्यारीत असलेले चिकन मार्केट येथील गाडे भाडे तत्वावर दिले असून येथील पाण्याची व्यवस्था सुद्धा नगर प्रशासन यांच्या देखरेखी मध्ये असते. आता उन्हाळ्याची चाहूल सुरू झाली असून रखरखते ऊन तापत आहे. मागील एक महिन्यापासून राजुरा नगर परिषदेच्या हलगर्जी पणामुळे लाखो लिटर पाणी वाया जात असून कुंभकर्णी झोपेत असलेले नगर प्रशासनाला जाग कधी येणार! दररोज येथील फुटलेल्या पाण्याच्या टाकीतून हजारो लिटर पाण्याचा अपव्यय होत आहे.
केवळ शहरातील जनतेला नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आदेश दिल्या जाऊन स्वतः प्रशासन बघ्याची भूमिका घेताना दिसत आहे. या टाकीतून वाहणाऱ्या पाण्यामुळे ये-जा करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. प्रशासन केवळ बुजगावणे न बनता त्वरित देखभाल करून नवीन पाण्याची टाकी लावण्यात यावी अशी मागणी केली जात आहे.