लॉकडाऊनच्या भितीने महाराष्ट्रातील मजुरवर्ग तेलंगणातून परतीच्या मार्गावर
गोंडपिपरी(सुरज माडुरवार)
पहिल्या लॉकडाउन व संचारबंदी मध्ये राज्यातील लाखो मजुर तेलंगाना-आंध्रप्रदेश येथे अडकून पडले होते. या मजूर वर्गाला लॉकडाऊन काळात अनेक यातना भोगाव्या लागल्या. उपास-तापास सहन करावे लागले, अशा परिस्थितीत अनेक मजुरांनी स्वगृही परतण्यासाठी शेकडो किलोमीटरचे अंतर पायी गाठले.मजुरांची ही दयनीय अवस्था बघून पोडसा गावातील सरपंच देविदास सातपुते यांच्या प्रयत्नाने तसेच चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार बाळू धानोरकर, आमदार सुभाष धोटे यांनी शासनाकडे अथक प्रयत्न करून मजुरांना स्वगृही आणण्याची मंजुरी घेत स्वखर्चातून अनेक गाड्यांच्या माध्यमातून शेकडो मजुरांनी स्वगृही पोहोचविण्याचे सहकार्य केले होते आता मात्र मागील वर्षीपेक्षा जास्त मजूर मिरची तोडण्यासाठी तेलंगाना– आंध्र प्रदेश मध्ये असून मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या लॉक डाऊन च्या इशाऱ्यामुळे मजुरांसह प्रशासनापुढे मोठे आव्हान ठरले आहे.
गोंडपिपरी तालुक्यातील पोडसा येथे महाराष्ट्र तेलंगाना जोडणारा पूल आहे. याच मार्गाने तेलंगणात जाणाऱ्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील लाखो मजूर वर्ग हा मिरची तोडण्याकरिता तेलंगणा येथे गेला आहे. मागील वर्षी जीव मुठीत घेऊन परत आलेल्या मजुरां समोर पोट भरण्याचे आव्हान असल्यामुळे परत रोजगारासाठी मिरची तोडण्या करता परप्रांतात जावे लागले मात्र कोरोना ची दुसरी लाट समोर येण्याची चिन्हे दिसू लागल्याने मजुरांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून जगावे की मरावे असा प्रश्न निर्माण झाला आहे. परत देशात लाकडाऊन करावा लागल्यास सर्व मजूर वर्ग तेलंगाना येथे अडकून पडतील. बदलत्या वातावरणामुळे अन्न वस्त्र निवारा यापासून मुकावे लागेल की काय असा प्रश्न मजुरांमध्ये निर्माण होऊ लागला आहे. लॉक डाऊनच्या इशाऱ्यामुळे मजूरांना स्वगृही परतण्याची ओढ लागली आहे.
मागील वर्षी प्रमाणे मजुरांवर अशी वेळ येऊ नये यासाठी प्रशासनाने दिलेल्या नियमाचे पालन मजुरांनी करावे. सरकारने बाहेर गेलेल्या मजूरांना परत येण्याचे आवाहन करूनच लॉक डाऊन चा विचार करावा. मदत करण्यास मी सदैव तत्पर आहे. –देविदास सातपुते सरपंच पोडसा