आणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येक बाधितासाठी बेड आणि ऑक्सिजन सुविधेचे नियोजन करा : ना. वडेट्टीवार

0
335

 

कोरोना संसर्ग संदर्भात जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचा पालकमंत्र्यांकडून आढावा

चंद्रपूर, दि 27 जुलै : मुंबई -पुण्यामध्ये मोठ्या संख्येने कोरोना बाधितांची वाढ झाल्यामुळे त्यांना बेड मिळावे यासाठी प्रशासनाला धडपड करावी लागत आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने रुग्ण वाढत आहे. अशा परिस्थितीत कितीही रुग्ण वाढले तरी वैद्यकीय उपचार प्रत्येकाला मिळाले पाहिजे. त्यासाठी आणीबाणीच्या परिस्थितीत प्रत्येकाला बेड व ऑक्सिजन सुविधा मिळेल, याकडे लक्ष देण्याचे आवाहन पालकमंत्री ना. विजय वडेट्टीवार यांनी आज येथे केले.

राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार दोन दिवसांच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. जिल्हा मुख्यालयात आज त्यांनी विविध बैठका घेतल्या. कोरोना आजारात संदर्भातील महत्त्वपूर्ण बैठकीमध्ये त्यांनी जिल्ह्यामध्ये कोणत्याही परिस्थितीत प्रत्येकाला आणीबाणीच्या वेळी उपचार मिळतील अशा पद्धतीची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले.

चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक अद्यावत असणारे वन अकादमीच्या कोविड-19 सेंटरला त्यांनी भेट दिली. या ठिकाणच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना पासून सफाई कामगारांपर्यंत सर्वांचे उत्तम कामासाठी त्यांनी कौतुक केले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयातील 20 कलमी सभागृहात बैठक घेऊन आरोग्य यंत्रणेकडून जिल्ह्यातील उपाययोजनांबाबत जाणून घेतले. जिल्ह्यामध्ये चाचणीचे प्रमाण वाढवण्यात आले आहे. याशिवाय बाहेरून येणाऱ्या संदर्भात मोठ्या प्रमाणात जागृतता बाळगली जात आहे. त्यामुळे कॉन्टॅक्ट ट्रेसिंगवर अधिकाधिक भर देण्याचे त्यांनी सांगितले. यासाठी ग्रामीण स्तरावरची यंत्रणा आणखी बळकट करावी, तसेच शहरात बाहेरून येणाऱ्या प्रत्येक नागरिकाची नोंद झाली पाहिजे, या संदर्भातली यंत्रणा सतर्क करण्याचे त्यांनी निर्देश दिले.

ब्रह्मपुरी भागामध्ये मोठ्या प्रमाणात बाधित यांची संख्या वाढत आहे. अशा वेळी त्यांना त्याच ठिकाणी उत्तम वैद्यकीय सुविधा देता यावी. यासाठी काही खाजगी इस्पितळात यांना ताब्यात घेता येईल का ? आणखी नवीन कुठे उपाययोजना करता येईल ? यासंदर्भातही चाचपणी करण्याचे त्यांनी वरिष्ठांना निर्देश दिले. यावेळी आणीबाणीच्या प्रसंगात कोणत्या उपाययोजना करण्यात येऊ शकतात व केल्या जाऊ शकतात या बाबतचा आढावा त्यांनी घेतला.

जिल्ह्यामध्ये कोरोना आजाराचा उद्रेक झाल्यास आजमितीला 1200 बेडची व्यवस्था ठेवण्यात आली आहे. मात्र याहीपेक्षा संख्याबळ वाढल्यास कोण कोणत्या ठिकाणी उपाययोजना केली जाऊ शकते ? या संदर्भातले नियोजन यावेळी जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कर्डिले यांनी जिल्हाभरात सुरू असलेल्या उपाययोजना बद्दलची माहिती दिली. या बैठकीमध्ये जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. राजकुमार गेहलोत, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निवृत्ती राठोड महानगरपालिकेच्या आयुक्त राजेश मोहिते यांनी अनुक्रमे ग्रामीण, शहर व महानगर क्षेत्रात सुरू असणाऱ्या उपाययोजनांबाबतची माहिती दिली. यावेळी पालकमंत्र्यांनी डॉक्टरांची कमतरता भासणार नाही यासाठी कंत्राटी पद्धतीने कोरोना काळात खाजगी प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांना मोठ्या संख्येने सहभागी करून देण्याचे निर्देशही दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here