प्रजासत्ताक दिनी ट्रॅक्टर मोर्चा, बाइक तिरंगा रॅली
दिल्ली येथील किसान आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी आंदोलन
चंद्रपूर : केंद्र सरकारने कृषी विधेयके रद्द करावे, या मागणीसाठी दिल्लीच्या सीमेवर शेतक-यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी अखिल भारतीय किसान संघर्ष समिती चंद्रपूरच्या वतीने प्रजासत्ताकदिनाचे औचित्य साधून २६ जानेवारीला दुपारी १२ वाजता ट्रॅक्टर विराट मोर्चा, बाईक तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
केंद्र सरकारने शेतक-यांच्या नेत्यांशी तब्बल ११ वेळा बैठका घेतल्या. मात्र, त्यातून तोडगा काढण्यात केंद्र सरकारला अपयश आले आहे. त्यामुळे शेतक-यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. देशभरातील विविध संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शविला आहे. चंद्रपूर शहरात देखील विविध शेतकरी संघटना व कामगार संघटनांनी या आंदोलनाला पाठींबा दर्शवित रॅली काढण्याचा निर्णय घेतला आहे. या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन काँग्रेसचे चंद्रपूर शहर जिल्हाध्यक्ष रितेश उर्फ रामू तिवारी यांनी केले आहे.