निवडणूक पंचायतीची बोलबाला मोगरकरांचा ‘

0
516

निवडणूक पंचायतीची बोलबाला मोगरकरांचा ‘

देवाडा खुर्द ग्रामपंचायतीवर विकास परिवर्तन पॅनल ‘ चे वर्चस्व 

स्वबळावर निवडून आणले ११ पैकी ९ सदस्य 

 काॅन्ग्रेस बिजेपी समर्थीत पॅनलला खाताही उघडता आला नाही 

तालुक्यातील सर्वात मोठ्या व काॅन्ग्रेस, भाजपा व इतर पक्षांसाठी प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या देवाडा खुर्द ग्राम पंचायत मध्ये विलास मोगरकर नावाच्या झंझावाताने मोठ्या मताधिक्याने ११ पैकी ९ सदस्य निवडून आणत स्वतःच्याच नावाचा परत एकदा झेंडा रोवला आहे. स्वतः विलास मोगरकर ३३२ मताच्या फरकाने निवडून आले. देवाडा खुर्द गावात ‘ साहेब ‘समजल्या जाणाऱ्या या बिलंदर इसमाने २०१५ च्या निवडणुकीत ८ सदस्य निवडून आणले होते. सहसा दुसऱ्या खेपेस मताधिक्य कमी होत असते, परंतु वाढीव मताधिक्य व एक सदस्य आणखी वाढवून मोगरकरांनी स्वतःचाच विक्रम मोडीत काढला आहे. त्यामुळे त्यांची गावावरील पकड आणखीनच घट्ट झाल्याचे दिसून येत आहे. मोगरकरांनी ‘ ग्राम विकास परिवर्तन पॅनल ‘ च्या नावाखाली ही निवडणूक लढवली होती.

११ डिसेंबर ला निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर काॅन्ग्रेस, भाजपा, बहुजन समाज पार्टी समर्थनाच्या चर्चांना सुरूवात झाली. भाजपा च्या ध्येय धोरणांचा विरोध म्हणून मागे झालेल्या लोकसभा, विधानसभा निवडणूकांत विलास मोगरकरांनी ४ हजार मतदार संख्या असलेल्या देवाडा खुर्द गावातून काॅन्ग्रेसच्या दोन्ही उमेदवारांना मतांची सरसी मिळवून दिली होती. तरी परंतु तालुका काॅन्ग्रेस मधील जेष्ट कार्यकर्त्यांसोबत असलेल्या अंतर्गत विरोधामुळे किंबहुना त्यांच्यामधील असलेल्या मतभेदामुळे मोगरकर काॅन्ग्रेस चा झेंडा हातात घ्यायला तयार झाले नाहीत. तरीपण ते वातावरण निर्मितीत कुठेही कमी पडले नाहीत. देवाडा खुर्द व परिसरातील गावात विलास मोगरकरांबद्दल आदर सन्मान असल्याचेच एकंदरीत निवडणूक निकालातून समोर आले आहे.

गावातील जेष्ट नागरीक व म्हाताऱ्या-कोताऱ्यांची दिवसभर त्यांच्या घरी ये-जा सुरू असते. त्यांना वागणूकही सन्मानाची मिळत आली आहे. मृदु भाषीक विलास मोगरकरांच्या वाणीतून सगळ्यांसाठीच सन्मानपूर्वक वागणूकीचा शब्दोच्चार ऐकायला मिळतो. क्षणात आपलेसे करून घेण्याची किमया मोगरकरांकडून शिकण्यासारखीच आहे. विलास मोगरकरांच्या ‘ ग्राम विकास परिवर्तन पॅनल ‘च्या विरोधात भाजपा,काॅन्ग्रेस ने प्रत्येकी सहा व पाच उमेदवार उभे केले होते. काॅन्ग्रेस- भाजपा समर्थीत पॅनल एकमेका विरोधात उमेदवार उभे न केल्याने ही छुपी युतीच असल्याची चर्चा तालुकाभर होती, पन या दोन्ही प्रमुख पक्षांनी युती असल्याचे कधीच स्विकार केले नव्हते. बहुजन समाज पार्टी समर्थीत पॅनल ने आपले ३ उमेदवार उभे केले होते. त्यातून त्यांनी २ जागेवर विजय मिळवून आपले वर्चस्व आबाधित राखले. परंतु भाजपा किंवा काॅन्ग्रेस समर्थीत पॅनलला आपआपले खातेही उघडता आले नाही. नेतृत्वहीन काॅन्ग्रेस समर्थीत पॅनल पूर्णपणे भरकटलेली दिसली, तर भाजपा समर्थीत पॅनलचे नेतृत्व स्वतः विद्यमान उपसभापतीने करून सुध्दा त्यांना एकही जागा जींकता आली नसल्याने गावातील नागरिकांनी अप्रत्यक्षपणे त्यांच्या स्वगावातील नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उभे केले आहे. ग्राम विकास परिवर्तन पॅनल ‘ ने मात्र नऊ जागेवर मोठ्या मतांच्या फरकाने विजयश्री खेचून आणला.

२०१५ च्या निवडणुकीत ८ सदस्य निवडून आणत विलास मोगरकरांनी गत ५ वर्षे सरपंच पद भूषविले होते. ५ वर्षाच्या सरपंच पदाच्या कारकिर्दीत विरोधकांना विलास मोगरकरांवर भ्रष्टाचाराचा कुठलाही आरोप करता आला नव्हता. त्यामुळे त्यांची निष्कलंक प्रतिमा आबाधित राहीली. त्यामुळेच की काय, गावातील मतदारांचा कल त्यांच्या बाजूने सुरूवातीपासूनच झूकता राहीला. ११ सदस्य असलेल्या ग्राम पंचायतीच्या सरपंचावर भ्रष्टाचाराचा एकही आरोप होऊ नये ही त्यांच्यासाठी जमेची बाजू ठरली. आता सरपंचाचे आरक्षण येणे बाकी आहे. सर्वच प्रवर्गातील विजयी सदस्य त्यांच्याजवळ आहेत. सरपंच पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडते हे आत्ताच सांगता येत नसले, तरी लायकीचा सरपंच बनवताना विलास मोगरकर चुकणार नाहीत याची गावकऱ्यांना खात्री आहे. हा मोठा विजय असुन कुठेच विजयाचा उन्माद दिसुन येत नसल्याने हा फक्त जनभावनेचा आदर असल्याचे गावातील जेष्ट नागरीकांच्या प्रतिक्रिया आहेत. 🔅
=================================

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here