शेतकऱ्यांच्या ८ डिसेंबरच्या ‘भारत बंद’ला नागरिकांची साथ
चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा
चंद्रपूर : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने आणलेल्या तीन कृषी कायद्याविरोधात देशभरातून जनमत एकवटले आहे. हे कायदे रद्द करावेत या मागण्यासाठी दिल्लीत लाखो शेतकरी ठाण मांडून आहेत. सरकारशी चर्चेच्या फेऱ्या होऊनही त्यातून काहीच निष्पन्न होत नाही हे चित्र असल्याने संयुक्त शेतकरी आघाडीने ८ डिसेंबरला ‘भारत बंद’ची हाक दिली होती. शेतकऱ्यांच्या या ‘भारत बंद’ला चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटीने सक्रीय पाठिंबा देत चंद्रपुरातील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने या बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले होते. त्याला नागरिकांनी साथ देत १०० टक्के बंद ठेवण्यात आला होता. चंद्रपूर शहर (जिल्हा) काँग्रेस कमिटी अध्यक्ष रामू तिवारी यांच्या नेतृत्वात निषेध मोर्चा काढण्यात आला होता. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात युवकांच्या सहभाग होता.
यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, माजी स्थायी समिती सभापती संतोष लहामगे, महिला कांग्रेस अध्यक्ष सुनीता अग्रवाल, माजी महापौर संगीता अमृतकर, अश्विनी खोब्रागडे, अनुश्री दहेगांवकर, नगरसेवक प्रशांत दानव, प्रवीण पडवेकर, प्रसन्न शिरवार, नगरसेविका संगीता भोयर, वंदना भागवत, उमाकांत धांडे, मोहन डोंगरे, गोपाल अमृतकर, युवक कांग्रेसचे सचिन कत्याल, कादर राहिल शेख, एनएसयूआय चे कुणाल चहारे, किसान सेलचे अध्यक्ष भालचंद्र दानव, अख्तर सिद्दीकी, नरेंद्र बोबडे, मीनल शर्मा, राजु वासेकर, श्रीनू बंडेवार, साबिर सिद्दीकी, रवि रेड्डी, अजय बल्की, केतन दुरशेलवार, वैभव येरगुडे, लल्लेश्वर पाजनकर, अश्पाक हुसैन, काशिफ अली, अंकुर तिवारी, कृष्णा यादव, सुरेश दुरसेलवार याची उपस्थिती होती.
यासंदर्भात रामू तिवारी म्हणाले की, या कृषी कायद्याविषयी शेतकऱ्यांच्या भावना अत्यंत तीव्र आहेत, त्यांच्या अस्तित्वाची लढाई आहे. शेतकऱ्यांच्या या लढाईत काँग्रेस पक्ष नेहमीच भक्कमपणे उभा राहिला आहे. शेतकऱ्यांच्या हितासाठी हे काळे कायदे रद्द करावेत हीच काँग्रेसची भूमिका राहिली आहे. या कायद्याविरोधात काँग्रेस पक्षाने देशव्यापी आंदोलने ही केली आहेत. राहुल गांधी यांनी पंजाब आणि हरियाणामध्ये या काळ्या कायद्यांविरोधात ट्रॅक्टर रॅली ही काढल्या आहेत. महाराष्ट्रातही विविध आंदोलने करुन या कायद्यांना विरोध दर्शवलेला आहे. यावेळी धरणे आंदोलन, निषेध मोर्चे काढून या बंदमध्ये सहभागी झाले होते.
शेतकऱ्यांनी ही लढाई आरपारची केली असून तिन्ही कृषी कायदे रद्द केल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतलेली आहे. दहा दिवसांपासून लाखोंच्या संख्येने पंजाब, हरयाणा, उत्तर प्रदेशसह देशातील अनेक राज्यांमधील शेतकऱ्यांनी राजधानी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन छेडले आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या रास्त असून त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही त्यांच्यासोबत आहोत, असेही रामू तिवारी म्हणाले.